काँग्रेसने गुजरात निवडणुकीच्या पराभवाचे खापर फोडले आपच्या डोक्यावर

 

गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला ऐतिहासिक असं यश मिळालं आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसला गेल्या निवडणुकी इतक्या देखील जागा मिळवता आलेल्या नाहीत. ‘आप’ने गुजरातमध्ये खातं उघडण्यात यश मिळवलं आहे. गुजरातमध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर आता काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला सर्वाधिक फटका हा आम आदमी पार्टीमुळे बसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे आता केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला रोखण्याच्या रणनितीवर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

‘पराभवासाठी आप जबाबदार’ गुजरातमध्ये कॉंग्रेसला सर्वाधिक फटका आम आदमी पक्षामुळेच बसला असून, भाजप आणि आपची छुपी मैत्री याला कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे आता दिल्ली महापालिकेत सत्ता मिळविणाऱ्या आणि गुजरातमध्ये खाते उघडणाऱ्या आम आदमी पक्षामुळे होणारे राजकीय नुकसान टाळण्यासाठीच्या रणनितीवर काँग्रेस नेते काम करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि आपमधील छुप्या मैत्रीकडे जनतेचे लक्ष वेधण्यावर काँग्रेसकडून भर दिला जाणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं.

काँग्रेसने बोलावली सर्वपक्षीय बैठक दरम्यान दुसरीकडे आज काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या रणनितीवर चर्चा होणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सध्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत आहे. सरकार या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करू शकते. त्यामुळे विरोधक आता अधिक सतर्क झाले असून, विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Team Global News Marathi: