चित्रा वाघ यांच्या सावरकरांबाबतच्या ‘त्या’ ट्विटवर रत्नागिरीमध्ये संतापाची लाट

 

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या ट्विटमुळे रत्नागिरीत संतापाची लाट पसरली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी 25 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी दौरा केला होता .आपल्या या रत्नागिरी दौऱ्यात त्यांनी शहरातील प्रसिद्ध पतित पावन मंदिराला भेट दिली. यानंतर चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं होतं, या ट्विटमुळेच चित्रा वाघ आता अडचणीत सापडल्या आहेत. त्यांच्याविरोधात रत्नागिरीकर आक्रमक झाले आहेत.

काय आहे नेमका वाद?

त्यांनी आपल्या रत्नागिरी दौऱ्यात शहरातील प्रसिद्ध पतित पावन मंदिराला भेट दिली. या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं होतं. श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी बांधलेल्या या पतित पावन मंदिराचा उल्लेख करण्याऐवजी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधलेल्या पतितपावन मंदिरात जावून पूजा केली असा उल्लेख केला होता. यावरून रत्नागिरीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी आक्रमक तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस देखील चित्रा वाघ यांच्या या ट्विटनंतर आक्रमक झाले आहे. हा तर भागोजी शेठ कीर यांचे कार्य नष्ट करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा रत्नागिरीत फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी दिला आहे. ते शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीने चित्रा वाघ यांच्या या ट्विटचा निषेध देखील करण्यात आला आहे

Team Global News Marathi: