महिला अत्याचाराच्या मुद्यावरून राज्यपाल कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पाहण्यास मिळाला. राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रातून जशास तसे उत्तर दिले. पण, ‘मुख्यमंत्री कार्यालयात काही अधिकारी अपरिपक्व आहेत. अशा प्रकारचे पत्र पाठवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातरजमा केली पाहिजे’ अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, १३ आमदारांनी शक्ती कायदा तसंच इतर बाबींबाबत मागणी केली आहे. शक्ती कायदा लवकर व्हावा अशी मागणी आमदारांनी केली आहे. ती मागणी राज्यपालांनी पुढे पाठवली आहे. त्या पत्राचा आपण विचार करावा असे राज्यपाल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हणाले आहेत.
पण, मुख्यमंत्री कार्यालयात काही अधिकारी अपरिपक्व आहेत. अशा प्रकारचे पत्र पाठवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातरजमा केली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले. तसंच, राज्यपालांना आदेश देण्याचा अधिकारी आहेत पण त्यांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या मागण्यांचे पत्र पुढे पाठवले आहे. दिवसभर रिसर्च करत पत्र पाठवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी त्यावर विचार करायला हवा जेणेकरून राज्यातील महिला अत्याचार कमी होतील, असा टोलाही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला