चंद्रकांत पाटलांनी हवेत गोळीबार करु नये, त्यांना अफवा पसरवण्याची सवयच-संजय राऊत

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीतील एका नेत्याविषयी खळबळजनक दावा केला. उद्या भरचौकात उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही असे मला कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्र्यांने सांगितले असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केले होते. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांनी हवेत गोळीबार करु नये, त्यांना अफवा पसरवण्याची सवयच आहे असे राऊत म्हणाले होते.

संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. राऊत म्हणाले की, एक मंत्री कोण? ते सांगावे. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयी देखील त्यांनी निश्चित राहावे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील यांनी मंत्र्याचे नाव न घेता सांगितले होते की, मला महाविकास आघाडीतील एका वरीष्ठ मंत्र्याने सांगितले की, उद्या भरचौकात उद्धव ठाकरेंनी आमच्या थोबाडीत जरी मारली तरी आम्ही सरकारमधून बाहेर पडणार नाही. इतकेच काय तर, इतक्या अनपेक्षितपणे आम्हाला सत्ता मिळाली आहे. याची आम्हाला कल्पनाही नव्हती. एवढी अनपेक्षितपणे मिळालेली सत्ता आम्ही घालवू कशी? असे देखील कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्री मला म्हणाले असल्याचे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: