तुम्हाला मग फक्त अशाच कोण्या नितीशसाठी, कधी ममतांसाठी टाळ्या वाजवाव्या लागतील

तुम्हाला मग फक्त अशाच कोण्या नितीशसाठी, कधी ममतांसाठी टाळ्या वाजवाव्या लागतील.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर काल एका चर्चेत सोबत होते. तेव्हा बोलताना त्यांनी आसामच्या २००६ मधील विधानसभा निवडणुकीचा संदर्भ दिला. प्रमोद महाजन या निवडणुकीचे प्रभारी असल्याने भातखळकर तिथे प्रचारासाठी गेले होते. त्या निवडणुकीत अवघ्या १० जागा जिंकणारा भाजप त्यानंतर दहाच वर्षात तिथे सत्तारूढ झाला.

गुवाहाटी विद्यापीठातील प्राध्यापक संध्या गोस्वामी यांचे ‘आसाम पॉलिटिक्स – इन पोस्ट कॉंग्रेस एरा’ हे पु्स्तक या संदर्भात महत्त्वाचे. १९४६ पासून या भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काम सुरू केले. अवैध स्थलांतरितांचा मुद्दा मांडत राहिले. उपेक्षा, मानहानी, साधनसामग्रीची कमतरता, दहशत अशी कशाचीच तमा न बाळगता संघ काम करत राहिला आणि आज आसामात दुस-यांदा भाजप सत्तेत आला आहे. त्यासाठी सात दशकांची मेहनत आहे. आणि, तरीही भाजपसाठी हे साध्य नाही. साधन आहे.

ज्या बंगालात डाव्यांचा किल्ला अभेद्य होता, तो पार नेस्तनाबूत करून, कॉंग्रेसची ऐशी की तैशी करून भाजपने आता बंगालात ती संपूर्ण स्पेस मिळवली आहे.

ममता वाघीण आहे आणि या विजयासाठी त्यांचे जेवढे कौतुक होत आहे, ते थोडेच आहे. पण, ममतांसाठी हा ‘आखाडा’ आहे आणि भाजपसाठी ही विचाराची लढाई आहे.
ममता आज भाजपच्या विरोधात आहेत. काल वाजपेयींच्या मंत्रिमंडळात होत्या. भाजपसोबत होत्या. परवा आणि पुन्हा काल कॉंग्रेससोबत होत्या. आज कुठे आहेत? उद्या आणखी कुठे असतील!

ममतांवर भिस्त ठेवणा-यांनी नितीशकुमारांच्या नावानेही देव पाण्यात ठेवले होते. मोदींच्या विरोधात त्यांना उतरवले होते. पुढे काय झाले, त्याला इतिहास साक्ष आहे.

पूर्व, ईशान्य, दक्षिण वगैरे सोडा. अरे, फुले – शाहू – आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गेल्या दोन्ही विधानसभा निवडणुका भाजपने जिंकल्या, हे विसरून चालणार नाही. १९८५ च्या निवडणुकीत शेकापएवढ्याच जागा जिंकणारा भाजप नंतर दहा वर्षांत थेट सत्तेत कसा आला?

भाजपला विचारांचं काही पडलेलं नाही, असं जे म्हणतात, त्यांना भाजप समजलेला नाही. भाजपएवढा विचारांचं पडलेला पक्ष कोणताही नाही. भाजपची सगळी लढाई ही विचाराची, विचारासाठीच आहे. त्यांना सत्तेत काही रस नाही. सत्ता हे या विचारासाठीचे वाहन आहे. त्यामुळे त्यांना सत्ता हवी आहे. सांस्कृतिक सत्ता होतीच. आता राजकीय सत्ताही मिळते आहे.

ही लढाई विचाराची आहे, हे मूल्यात्मक भान अद्यापही विरोधकांना नाही.
ममतांसारखे बलवान प्रादेशिक नेते भाजपला हवेच असतात. विरोधकांच्या विरोधाचाही त्यामुळे निचरा होतो. त्यांना आउटलेट मिळतो. त्यामुळे काही राज्ये विरोधकांच्या हातात जातात, पण अंतिमतः देशावर राज्य आपलेच असते.

भाजपला जे ‘नॅरेटिव्ह’ सेट करायचे आहे, ते लक्षात घेतले पाहिजे. बंगालच काय, केरळमध्येही त्यांनी आपल्याला हवे असणारे ‘नॅरेटिव्ह’ विकसित केले आहे. सत्तासंघर्षाची चौकट बदलून टाकली आहे. तामिळनाडूसारख्या राज्यात त्यांना अद्याप यश येत नसले, तरी अन्यत्र हे त्यांनी व्यवस्थितपणे केले आहे. आपल्याला फक्त जागांचा हिशेब कळतो. मतांची टक्केवारी समजत नाही. भाजपला ती समजते. हैदराबादसारखी महापालिका असो की मुंबई महापालिका, हरणारी निवडणूक ते उगाच निकराने लढत नाहीत! जिथे भाजप दखलपात्रही नव्हते, तिथे त्यांना पराभूत करणे हेच अजिंक्यपद मानले जावे, असे मुख्य पात्र ते कधी होतात, हे कोणालाच समजत नाही. पूर्वी काहीच हातात नव्हते, तेव्हाही निष्ठेने भाजप हे करत होता. आज तर, त्यांच्यासोबत निवडणूक आयोग, सीबीआय, इडी, न्यायालये असे सगळेच आहे.

भाजपमध्ये हे गेले, ते गेले आणि त्यामुळे भाजपचा चेहराच बदलला, असे म्हणणा-यांनी हे लक्षात घ्यावे की काहीही झाले तरी भाजपची ‘कोअर टीम’ कायम असते. आणि, ती कधीच पक्ष सोडत नाही. भाजप राजकीयदृष्ट्या अगदी दुबळी असतानाही, त्यांच्याकडे एवढे दिग्गज नेते देशभरात होते की त्यांनी पक्षांतर केले असते, तर हवी ती पदे त्यांना मिळाली असती. पण, यापैकी कोणीही पक्ष कधीच सोडला नाही. आज सत्ता आली नसती, तरीही ना मोदींनी पक्ष सोडला असता, ना देवेंद्र फडणवीसांनी. ते आणखी जोरकसपणे काम करत राहिलेच असते. युती तर ते मेहबुबांसोबतही करू शकतात, पण त्यानंतर पुढे काय करायचे आहे, याचे भान त्यांना पक्के असते.

मूल्यात्मक भान प्रादेशिक पक्षांना असणे अपेक्षित नसते. अनेकदा त्यांची दृष्टी संकुचित असते. व्यक्तिगत आकांक्षेशी ती जोडलेली असते. पुढे ती ‘लिमिटेड कंपनी’ होत जाते. कुटुंब कल्याणाच्या कामी सगळी शक्ती पणाला लागते.

असे भान असायला हवे ते कॉंग्रेसला. साम्यवाद्यांना. समाजवाद्यांना. आंबेडकरवाद्यांना.

भाजप रोज नवी भूमी पादाक्रांत करत असताना, आपण मात्र भूमी गमावत आहोत, हे यांना आजही समजत नाही!
निवडणूक निकालानंतर मौनात जाणे, हे यावरचे उत्तर नसते. अशा कैक निवडणुका हरल्यानंतरही जनसंघ वा भाजपने ना हिंमत हरली, ना आपली निष्ठा बदलली.
राज्यात अर्धीमुर्धी सत्ता आली की लगेच सरंजामी मोडमध्ये गेलेल्या कॉंग्रेसला हे मूल्यात्मक भान कसे यावे?

भाजप कायम निवडणूक मोडवर असते- म्हणून भाजपविरोधकही तसा अनुयय करू पाहातात. भाजपच्या आयटी सेलचा आदर्श घेऊन ट्रोलसेनाही उभी करू पाहातात.
अरे, पण ही लढाई विचारांची आहे, याचे जे भान भाजपकडे आहे, ते तुमच्याकडे जराही नाही, त्याचे काय करायचे? कोणता विचार चूक, कोणता बरोबर; कोणता संकुचित आणि कोणता व्यापक, या चर्चा करून उपयोग नाही. ही लढाईच मुळात विचाराची आहे- सांस्कृतिक आहे, हे समजल्याशिवाय हा संघर्षच तुम्हाला करता येणार नाही. तशी व्यूहरचना आखता येणार नाही.

तुम्हाला मग फक्त अशाच कोण्या नितीशसाठी, कधी ममतांसाठी टाळ्या वाजवाव्या लागतील.
पण, तुमचा पराभव मात्र अटळ आहे.

– संजय आवटे
राज्य संपादक दिव्य मराठी

ग्लोबल न्युज नेटवर्क: