“समर्थ आणि सशक्त समाज घडविण्यात अंगणवाडी सेविकांचे महत्त्वाचे योगदान”

 

ग्रामीण भागातील लहान मुलांचे भोजन, शिक्षण, आरोग्याची काळजी घेत त्याच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिकांचे समर्थ आणि सशक्त समाज घडविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा ग्रामविकासचा कणा असलेल्या स्त्रीशक्तीचा सत्कार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस,व पर्यवेक्षिका जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला जि. प.अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतारे, महिला व बालकल्याण सभापती पुजाताई पारगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे आदी उपस्थित होते

श्री.पवार म्हणाले, अंगणवाडी सेविका खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करतात. ग्रामीण भागातील घराघरात त्यांचा संपर्क असतो. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. शासकीय योजनांचे आणि परिणामतः शासनाचे यश त्यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. शेती आरोग्य, पोषण आहाराच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहीचविण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: