मुंबई l ६ सप्टेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचा जोर पुन्हा वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे राज्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असतानाच शुक्रवारी ब-यापैकी ऊन्हाचा तडाखा बसल्याचे चित्र होते.
मुंबईसह राज्यभरात मान्सूनने विश्रांती घेतली असली तरीदेखील भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात ब-याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ६ सप्टेंबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ७ सप्टेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.
८ सप्टेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ५ आणि ६ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी, रात्री आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल, अशीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.