भाजपा आमदार राम कदम पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांना पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालघर येथे झालेल्या गाडचिंचले हत्याकांड प्रकरणी त्यांनी जनआक्रोश यात्रेचे आयोजन केले होते. आमदार कदम आपल्या घाटकोपर निवासस्थानावरून या यात्रेला प्रारंभ करणार होते. त्यामुळे मोठया प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनाद करण्यात आला होता.
त्यात आमदार राम कदम आपल्या समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करत ताब्यात घेतले. “हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याची,” प्रतिक्रिया राम कदम यांनी यावेळी उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.
राम कदम यांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. पालघर हत्याकांडाला २११ दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती. राम कदम यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणीदेखील केली आहे.