रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढवा नाहीतर मातोश्री जवळ आंदोलन करणार, या भाजपा नेत्याचा इशारा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक विविध प्रश्नांद्वारे महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढवण्याची मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे. अन्यथा मातोश्री जवळ आंदोलन करून चक्काजाम करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
हाजी अराफत शेख यांनी शनिवारी पत्रकार माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीची मागणी केली. तीन चाकी सरकारला तीन चाकी ऑटोचा विसर पडला आहे. राज्य सरकार रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर गुंडगिरी करत आहे.
राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात दोन ते तीन रुपयांची वाढ करावी. अन्यथा २५ डिसेंबरला मातोश्रीवर रिक्षा आणि टॅक्सी नेऊन चक्का जाम करु, असे हाजी अराफत शेखर यांनी सांगितले.
राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यापासून भाजपकडून शिवसेनेची कोंडी करण्याची एकही संधी सोडली जात नाही.
आतापर्यंत कोरोना काळातील उपाययोजनांची अंमलबाजवणी, वीज बिल, मेट्रो कारशेड आणि मंदिरे उघडण्याच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेत भाजपने शिवसेनेला जेरीस आणले आहे. त्यामुळे आता शिवसेना आपल्या वाहतूक संघटना आणि नेत्यांच्या माध्यमातून राज्य सरकार टॅक्सी आणि रिक्षा चालकांशी संवाद साधणार का, हे पाहावे लागेल.