भाजप नेते किरीट सोमय्या यांचेविरूद्ध दाखल केलेली लोंढेंची तक्रार न्यायालयाने केली खारीज

 

नागपूर | काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारद्वारे राज्यात राजरोसपणे वसुली सुरू आहे. १०० कोटीच्या वसुली प्रकरणातील आरोपी असलेले अनिल देशमुख कारागृहात आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे किरीट सोमय्या यांनी जाहिर केले. या सरकारचा भ्रष्टाचारी कारभार सर्वश्रुत असताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते म्हणवून घेणारे अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्याद्वारे तीनही पक्षांची बदनामी केली जात असल्याचे सांगून त्यांच्या विरोधात नागपूर येथील फौजदारी न्यायालयात तक्रार याचिका दाखल केली होती.

मात्र सदर तक्रार तत्थ्यहीन असल्याचा निर्वाळा देत मा. न्यायालयाने लोंढेंची तक्रार याचिका खारीज केली. एकूणच राजकीय आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अतुल लोंढे यांनी ही तक्रार याचिका दाखल केल्याचे आता स्पष्ट झाले असून काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्याचा बालिशपणा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे, असा टोला भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी लगावला.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्या यांच्या आरोपावर न्यायालयात जाण्याची धमकी देणे आणि पुढे न्यायालयाने त्यांची तक्रार याचिकाच फेटाळून लावणे या अतुल लोंढे यांच्या कृतीचा भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला.

एका मुलाखती दरम्यान किरीट सोमय्या राज्य सरकारकडे वसुलीचा जो पैसा येतो, त्यातील ४० टक्के राष्ट्रवादी कॉंग्रेसला, ४० टक्के शिवसेनेला आणि २० टक्के हिस्सा कॉंग्रेसला जातो, असा आरोप केला असल्याचे सांगून अतुल लोंढे यांनी किरीट सोमय्या यांच्या कथित विधानाविरूद्ध पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली व न्यायालयात जाण्याची धमकीही दिली होती. या संपूर्ण कृतीचा भाजपाचे प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी त्यावेळी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून समाचारही घेतला होता.

काँग्रेसचे माजी मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नियुक्त केलेले अतुल लोंढे यांचे मुख्य प्रवक्ता पदासाठी वाद असताना लोंढे यांनी मुख्य प्रवक्ता पदाचे महत्व समजून न घेता केवळ आपली उपस्थिती दाखविण्याच्या नादात अशा प्रकारचा आरोप करणे आणि न्यायालयात जाण्याची धमकी देणे किंवा पोलिस आयुक्तांकडे तक्रार हे त्यांना राजकीय शहाणपणा व समज नसल्याचे उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले होते.

Team Global News Marathi: