पायी वारीवरुन भाजपा आमदार गोपिचंद पडळकर आक्रमक, दिला आघाडी सरकारला इशारा !

राज्यावर कोरोना संसर्गाचे संकट ओढावलेले असताना याच पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाचा आग्रह असूनही संसर्गामुळे यंदा पायी वारी नाही अशी ठाम भूमिका ठाकरे सरकारने घेतली आहे. असे असताना आता मोजक्या वारकऱ्यांसह 3 जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात होणार असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणही यात एक दिवस सहभागी होणार असल्याचे वक्तव्य केल्यामुळे वारकरी संप्रदायात संभ्रम वाढला आहे.

 

राज्यातील सरकार दारू दुकाने सुरु करताना बैठक घेत नाही, बार सुरु करताना बैठक घेत नाही. मात्र बहुजन समाजाची शेकडो वर्षाच्या वारी परंपरेसाठी ठाकरे सरकार सारख्या बैठक घेते आणि शेवटी परवानगी नाकारते अशा शब्दात राज्यातील ठाकरे सरकारवर गोपीचंद पडळकरांनी निशाणा साधला यावेळी वारी व्हावी म्हणुन छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला औरंगजेबाच्या काळात सरंक्षण दिले होते. हे सोनिया सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचे घेतात, काम मात्र औरंगजेबाचे करतात, असा टोला लगावला.

कोरोनाचे सर्व नियम पाळून शिस्तीने पायी वारीसाठी वारकरी तयार असतानासुद्धा हे ठाकरे सरकार कुणाच्या दबावाखाली या शेकडो वर्ष चालत आलेल्या हिंदू परंपरेत ख्वाडा घालत आहे? असा सवाल करत काही वारकरी ३ जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात करणार आहे. आपणही एक दिवस यात सामील होणार असल्याचे सांगताना आळंदी ते पंढरपूर निघणाऱ्या माझी वारी माझी जबाबदारी यात सहभागी होणार असा संदेश सोशल मीडियातून गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

Team Global News Marathi: