मोठी बातमी : राज्यात लवकरच रात्रीचा लॉकडाऊन लावणार ? वाचा काय दिले अजित पवारांनी संकेत
मुंबई । ओमयक्रॅानचे या कोरोनाच्या नव्या विषाणुने जगभर नवे संकट निर्माण केले आहे. आपल्याकडे ओमायक्रॅानचे रुग्ण सर्वत्र सापडत आहे. त्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात आमदारच जर मुखपट्टी लावत नसतील तर त्यांना सदनाच्या बाहेर काढा,अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षांना केली.तसेच रात्रीचा लॅाकडाऊन लावण्यावर गांभिर्याने विचार चालु आहे,असेही ते म्हणाले.
सकाळी प्रश्नोत्तर झाल्यानंतर अजित पवार उठले आणि त्यांनी मुखपट्टी न लावण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. पवार म्हणाले, ओमायक्रॅान संसर्ग सर्वत्र वाढत आहे. युरोपात किमान ५ लाख नागरिक ओमायक्रॅानच्या लाटेत मृत्युमुखी पडतील, असा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. पंतप्रधान नव्या विषाणुने मोठ्या चिंतेत आहेत. ओमायक्रॅानपेक्षा अधिक घातक असा नवा कोरोना विषाणु आला आहे, असे नुकतेच माझ्या माहितीत आले.
आपल्याकडे ओमायक्रॅानचे रुग्ण सर्वत्र आढळू लागले आहेत.अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी असणारे आमदार मुखपट्टी लावत नसतील तर नागरिकांना काय सांगायचे. जे आमदार सदनात मुखपट्टी लावत नाहीत, त्यांना अध्यक्षांनी बाहेर काढले पाहिजे. याची नोंद अध्यक्षांनी घ्यावी, असे अजित पवार म्हणाले. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सदनाला तशी सूचना केली.
फारच त्रास होत असेल तर बोलताना मुखपट्टी काढली तर चालेल मात्र मुखपट्टी प्रत्येक सदस्याने लावली पाहिजे, अशी तंबी जाधव यांनी दिली. त्यानंतर लागलीच अनेक आमदारांनी खिशात ठेवलेली, गळ्याला लावलेली मुखपट्टी पटापट तोंडावर चढवली.
भारतात चिंता वाढली
देशात ओमीक्रोन रुग्ण पाच दिवसांत दुप्पट वाढले आहेत. आता कुठलीही प्रवासाची पार्श्वभूमी नसताना ओमायक्रॉन बाधित सापडू लागल्याने देशाची चिंता वाढली आहे. राज्येही वाढू लागली आहेत. १४ राज्यांत एकूण २२० हून अधिक जणांना ओमायक्रॉनी बाधा झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली यात आघाडीवर आहेत. यामुळे केंद्र सरकारचे टेन्शन वाढू लागले आहे. असे असले तरी लोक नवीन व्हेरिएंटबाबत गंभीर नाहीत. सध्या सुट्यांचा मौसम सुरु आहे. यामुळे ओमायक्रॉन वाढण्याची शक्यता असल्याने याचे संक्रमण रोखण्यासाठी नवीन गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना लोकांनी पाळल्या नाही आणि रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर गेली तर पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने राज्यांना दिशानिर्देश जारी केले आहेत. यामध्ये राज्यांनी परिस्थिती पाहून त्वरीत नाईट कर्फ्यू आणि कंटेनमेंट झोन सारखे उपाय करण्यासाठी अलर्ट रहावे असे म्हटले आहे. गेल्या १८ दिवसांत ही संख्या १०० पटींनी वाढली आहे. परंतु कोणत्याही रुग्णाला आयसीयूमध्ये जावे लागलेले नाही, ही दिलासा देणारी बाब आहे.
कंटेनमेंट झोन: विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी रात्रीचा कर्फ्यू, सार्वजनिक ठिकाणी जास्त गर्दी थांबवावी लागेल. विवाह आणि अंत्यसंस्कारातील लोकांची संख्या मर्यादित ठेवावी लागेल. कार्यालये, उद्योग आणि सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये नियमांची अंमलबजावणी करावी लागेल. रुग्णांच्या संख्येनुसार कंटेनमेंट झोन आणि बफर झोन निश्चित करावे लागतील. जीनोम सिक्वेन्सिंग प्राधान्याने केले पाहिजे.
ICMR आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानकांनुसार तपासणी आणि लक्ष ठेवणे ही प्रणाली लागू केली जावी. घरोघरी जाऊन रुग्णाची ओळख पटवण्यासाठी सर्वेक्षण केले पाहिजे. आरटी-पीसीआर चाचणीचे दर वाढवावेत. कोरोनाबाधित व्यक्तीला वेळेवर तपासणी करून उपचाराची सुविधा मिळावी. परदेशातून येणाऱ्या लोकांवर स्थानिक प्रशासनाने लक्ष ठेवावे.
क्लिनिकल मॅनेजमेंट: ओमिक्रॉनच्या वाढत्या व्याप्तीनुसार हॉस्पिटलमध्ये बेडची क्षमता वाढवली पाहिजे. रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलिंडर, औषधांचा साठा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा ठेवावा. होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी किट उपलब्ध करून द्याव्यात. कॉल सेंटर्स आणि घरोघरी भेटी देऊन रुग्णांवर लक्ष ठेवले पाहिजे. त्याचा उद्देश संसर्गाचा प्रसार रोखणे हा आहे.