केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल महाड येथील पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेल्या गंभीर वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. शिवाय, राज्यातील राजकीय वातावरण देखील कमालीचं तापलं आहे. शिवसेनेने राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत, राज्यभर आंदोलनं सुरू केली. तर भाजपा कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याने मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
महाड न्यायालयात सुनावणी सुरू असताना नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्यासह संपूर्ण राणे कुटुंब तिथे दाखल झाले होते. दरम्यान, नारायण राणे जबाबदार व्यक्ती आहेत, असं असतानाही ते बेजबाबदारीने का वागले? असा प्रश्न सरकारी वकिलाकडून उपस्थित करण्यात आला होता.
तर, नारायण राणेंच्या वकीलानी यावर युक्तीवाद करत म्हटलं की, त्यांच्यावर लावली गेलेली कलमं चुकीची आहेत,अशं सांगण्यात आलं होतं. २० मिनिटांपेक्षा अधिक वेळ हा युक्तीवाद सुरू होता. दोन्ही बाजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद केला. जवळपास तासभर न्यायालयाचं कामकाज चाललं.