भाजपा निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊतांची भाजपवर टीका

मागच्या दोन दिवसांपासून देशभरात नुपूर शर्मा हे नाव चर्चेत आलं आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी भाजपाच्या प्रवक्त्या असलेल्या नुपूर शर्मा यांना पक्षानं निलंबित केलं आहे. या प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखील इस्लामिक राष्ट्रांकडून निषेधाचा सूर उमटत असताना देशांतर्गत राजकारणात विरोधकांकडून भाजपाला लक्ष्य केलं जात आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना या मुद्द्यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी भाजपावर धर्माचं राजकारण अंगलट आल्याचा देखील आरोप केला आहे. “जगभरात जे वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे प्रथमच देशाला माफी मागावी लागली आहे. सगळे देश भारतावर टीका करत नाहीयेत, पण त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पहिल्यांदाच एखाद्या लहान देशाकडून मोठ्या देशाकडे माफी मागण्याचा आग्रह होत आहे.”

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत हॉटेल ट्रायडेंटमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “राज्यसभेसाठीची मतदानप्रक्रिया तांत्रिक असते. आमदारांना थोडं मार्गदर्शन करायचं असतं. म्हणून आमदारांना एकत्र ठेवलं जातं. असं भाजपाने, काँग्रेसने किंवा राष्ट्रवादीनेही केलं आहे. त्यामुळे थोबाडावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं काय आहे? तुम्ही केलेलं चालतं? तुमचं गेट-टुगेदर आणि आम्ही आमदारांना बाजूला घेऊन गेलो. मूर्ख लोक आहेत.”

Team Global News Marathi: