कमी भाव मिळत असल्याने केळी उत्पादक चिंतेत; अतिवृष्टीचा परिणाम
ग्लोबल न्यूज – चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला. परंतु सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि ऑक्टोबरमधील परतीच्या पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, हे नगदी पीक गेले. त्यातच बागायती पिकालाही मोठा फटका बसला आहे. राज्यातील केळी उत्पादक पडलेल्या भावामुळे चिंतेत आले आहेत. राज्यात जळगावनंतर नांदेडमध्ये सर्वाधिक केळीचे उत्पन्न घेतले जाते. जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर, नांदेड तालुक्यासह परिसराला केळी उत्पादनाचे माहेरघर समजले जाते. त्यामुळे या भागात ऊसानंतर शेतकरी केली पिकांची लागवड करत असतात.
रात्रदिवस कष्ट करुन लाखो रुपये खर्च करुन केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. मात्र, केळी काढणीला सुरुवात झाल्यापासून दरात घसरण होत आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण केळीला ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. त्यानंतर दरात अजून सुधारणा झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा केळीच्या दरात घट झाली. केळीला सध्या ५०० ते ६०० रुपये दर मिळत आहे. दरवर्षी नवरात्रो उत्सवाच्या काळात केळीच्या दरात वाढ होत असते. मात्र, यंदा केळीच्या दराने निच्चांक गाठला आहे. व्यापारी कोरोनाचे निमित्त साधून केळी ही अत्यंत कमी दरात घेत आहे.
जिल्ह्यातील केळी प्रामुख्याने दिल्ली, चंदीगड, हरियाणा, मथुरासह अनेक ठिकाणी विक्रीसाठी पाठवली जाते. त्याचबरोबर विदेशातही अर्धापूरच्या केळीची चव घेतली जाते. अतिवृष्टीमुळे केळीला रोगाची लागण झाल्याने केळी पिकण्यास सुरुवात झाली आहे. केळीचे घड झाडावरच असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच व्यापारी केळीची खरेदी करीत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च करुन शेतकऱ्यांच्या पदरात काही पडत नाही. यंदा केळी शेताच्या बाहेर काढणेसुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही. व्यापारी मनभाव केळी खरेदी करत आहेत.