बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी, पुन्हा राणे यांचा शिवसेनेला टोला
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यावरून बरेच वाद सुरु झाले आहे. आज तागायत शिवसैनिक औरंगाबादचा संभाजीनगर असाच उल्लेख करतात. महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाव बदल हा आमचा कार्यक्रम नसल्याचे सांगून शिवसेनेची नस दाबण्याचा प्रयत्न केला होता. यावरुन आमदार नितेश राणे यांनी हाच मुद्दा पकडत सेनेला चिमटा काढला आहे.
काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू. बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी!, संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्त्वाचा की मुख्यमंत्रिपदाची खुर्ची, असं ट्विट करत नितेश राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
काय म्हंटले होते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असे थोरात यांनी बोलून दाखविले होते.