बाळासाहेबांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत ‘बुडवून दाखवलं’
मुंबई :- राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना (Shiv Sena) असा जोरदार संघर्ष बघायला मिळत आहे. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना झालेली अटक. हनुमान चालीसा पठणाचा वाद आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेला हल्ला या मुद्द्यांनी सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. तर राणा दांपत्याच्या अटकेवरून भाजपने शिवसेने लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.
शिवसेना आता हनुमान चालीसा वाचणेही का नको वाटू लागले, असा प्रश्न आता भाजपकडून विचारला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हनुमान चालीसा आणि मशीदीवरील भोंग्यांचा मुद्दाही तापला आहे. अशातच आता भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना हिंदुत्वावरून डिवचले आहे.
हनुमान चालीसा वाचण्यावरून हा वाद पेटला आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही यावरून शिवसेनेवर निशणा साधताना ट्विट केले आहे की, उत्तम ! हिंदू धर्मियांचा पवित्र “हनुमान चालिसा” म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत ‘बुडवून दाखवलं’ ! असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.