‘शिवरायांवर बाबासाहेब पुरंदरे यांनी भाषण आणि लिखाणातून अन्याय केला’
रामदास आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय”
ग्लोबल न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांवर बाबासाहेब पुरंदरे यांनी भाषणातून आणि लिखाणातून अन्याय केला तेवढा अन्य कुणीच केला नसेल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा नव्याने वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यात आज श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचार प्रवाह या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर बोलत असताना त्यांनी हे विधान केले.
शरद पवार म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांनी जे काही लिखाण केले आहे, जी मांडणी केली आहे, त्याला सत्यावर विश्वास ठेवणारा घटक कधीही मान्य करणार नाही. बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या लेखणीतून नको त्या व्यक्तींचे महत्त्व वाढवण्याची काळजी घेतली आहे. रामदास यांचे योगदान काय, दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय, या सगळ्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर आक्षेप घेतला.
या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी श्रीमंत कोकाटे आणि दिवंगत गोविंद पानसरे यांचे कौतुक केले. ते म्हणाले अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण सध्या तरी त्या अनेकांना न पटण्यासारखे आहेत. परंतु श्रीमंत कोकाटे यांनी मात्र ते काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले आहे. सर्व गोष्टींचा वास्तवदर्शी चित्र त्यांनी आपल्या लिखाणातून केला आहे. अशाच प्रकारचे काम गोविंद पानसरे यांनी देखील केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.