रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
रिपब्लिकचा काय दावा-
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्वीट केलं आहे. “काही काळापूर्वी इंडियाज मोस्ट वॉण्टेड नावाचा शो होता आणि अँकर हत्या, आत्महत्या या मुद्द्यावर भाष्य करत असे. पण याच अँकरला त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. आता इंडियाच मोस्ट वॉण्टेडचा पार्ट 2 आहे. दुसरा अँकर तेच करतोय, आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक,” असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकार किती जणांचे आवाज दाबणार : कंगना रनौत
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर अभिनेत्री कंगना रनौतने महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार आणखी किती जणांचा आवाज दाबणार, असा सवाल तिने व्हिडीओ पोस्ट करुन विचारला आहे.