अण्णाभाऊ साठेंच्या नावाचे लवकरात लवकर नाट्यगृह सुरू करावे, पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 

मुंबईतील भायखळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावी असलेले नाट्यगृह बंद पडले आहे. नाट्यगृहाची दुरावस्था झाल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम लोककलाकारांचा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कर्तृत्वाचा अपमानच होतोय, १७ महिन्यांपासून रेंगाळलेले नाट्यगृहाचे काम आपण दिवाळीच्या अगोदर मार्गी लावावे, अशी विनंती भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांना पत्र लिहून यासंदर्भात मागणी केली आहे. दरम्यान, गोपीचंद पडळकर हे राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून माध्यमांतून दूर आहेत; परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एसटी संपातील निलंबित ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणीदेखील केली होती.

२०१४ ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती सरकारने प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर सभागृह उभे राहिले. मात्र महाविकास आघाडी सरकारने ते काम रखडुन ठेवले होते, असा आरोप पडळकर यांनी केला. याचसंदर्भात पडळकर यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहून अण्णाभाऊ साठेंच्या नावाचे हे नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

राज्यात आता बहुजन हिताचा विचार करणारे कार्यक्षम सरकार सत्तेवर आहे. नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे; परंतु मुंबई येथील सभागृह उद्घाटनाचे काम १७ महिन्यांपासून रेंगाळलेले आहे ते आपण दिवाळीच्या अगोदर मार्गी लावावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे नाट्यगृह प्रेक्षकांसाठी सुरू करावे. हाच खरा लोकशाहीर अण्णाभाऊचा गौरव असेल, असे पडळकर यांनी पत्रात म्हटले आहे.

Team Global News Marathi: