भारतात कोरोनाची लस कधी येणार याबाबत देशवासियांना मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी महत्वाची माहिती दिली आहे. आदर पुनावाला यांनी सांगितले की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनाच्या लसीच्या
आपत्कालीन वापरासाठी निवेदन करू शकते. युकेमधील ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनकाच्या स्वयंसेवकांवरील परिक्षणाच्या परिणामांवर हे आधारित असेल.
जगातील सगळ्यात मोठी लस निर्माण करणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी न्यूज १८ शी बोलताना मुलाखती दरम्यान सांगितले की, ”आतापर्यंत दीर्घकालीन सुरक्षेबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. लसीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी जवळपास २ ते ३ वर्षांचा कालावधी लागू शकतो. लोकांना स्वस्तात लस उपलब्ध करून दिली जाणार असून यूनिवर्सल इम्यूनाइजेशन प्रोग्राममध्ये समिल करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.
२०२० च्या शेवटापर्यंत कोरोनाची लस तयार होणार?
लसीकरणाबाबत बोलताना आदर पुनावाला यांनी सांगितले की,” या वर्षाच्या शेवटापर्यंत कोरोनाची लस उपलब्ध होईल की नाही याबाबत मत मांडणं घाई करण्यासारखं ठरेल. चाचण्यांचे यश हे रोगप्रतिकारक शक्ती आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असते. जर आपतकालीन परवान्यासाठी अर्ज केला नाही तर आमची चाचणी जानेवारीपर्यंत संपली पाहिजे आणि त्यानंतर आम्ही यूकेतील चाचणी प्रक्रिया जानेवारीमध्ये भारतात दाखल करू शकतो.
पुढे त्यांनी सांगितले की, ”सध्या लसीची ऍडव्हान्स चाचणी सुरू आहे. ब्रिटनने कोरोनाबाबत डेटा दिल्यास आपातकालीन स्थितीतील चाचणीसाठी आरोग्य मंत्र्यांना निवदेन दिलं जाणार आहे. मंत्रालयातून मंजूरी मिळाल्यानंतर चाचण्या भारतात केल्या जाणार आहेत. जर हे सगळं नियोजन यशस्वी ठरले तर डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात कोरोना व्हायरसची लस उपलब्ध होऊ शकते.
”सध्याच्या माहितीवरून दिसून येत आहे की या लसीबाबत कोणतीही काळजी करण्यासारखी बाब नाही. आता हजारो लोकांनी भारतात आणि परदेशात सुरक्षेची काळजी न करता या लसीची चाचणी सुरू ठेवली आहे. दरम्यान लसीचा दीर्घकालीन प्रभाव कळून येण्यासाठी २ ते ३ वर्षांचा काळ लागू शकतो. ही दोन डोस असणारी लस आहे. २८ दिवसांच्या अंतरावर हे दोन्ही डोस दिले जातील. आम्ही लसीकरणाबाबत सरकारशी चर्चा करत आहोत. यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. तसंच ही कोरोनाची लस खूपच स्वस्त असेल. यूनिवर्सल इम्यूनाइजेशन प्रोग्रामच्या अंतर्गत या लसीचा समावेश असणं महत्वाचे आहे. कारण कोरोनाच्या वैश्विक माहामारीने लसीचे महत्व दाखवून दिले आहे. ” असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
दरम्यान देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ४९,८८१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या साथीच्या रुग्णांची एकूण संख्या ८० लाखांहून अधिक झाली आहे, तर ७३.१५ लाख लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ९०.९९ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८०,४०,२०३ आहे. या आजारामुळे गुरुवारी आणखी ५१७ जण मरण पावले असून, बळींचा एकूण आकडा १,२०,५२७ वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४९ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. सध्या ६०,३,६८७ कोरोना रुग्ण उपचार घेत असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ७.५ टक्के आहे.