मुंबई महानगर पालिका निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढणार, अजित पवारांचे संकेत
बृहमुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा कालावधी बाकी असताना भारतीय जनता पक्षाने मनपाची सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी अध्यक्ष पदावर निवड होताच स्वबळाचा नारा दिला आहे.
त्यात आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबई महानगर पालिका निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढणार असल्याचे संकेत दिले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेमध्ये आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मित्रपक्षांसोबत मिळून ही निवडणूक लढवावी, अशी चर्चा सुरू आहे.
पुढे बोलताना पवार म्हणले के, या बाबतचा अंतिम निर्णय शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे घेणार आहेत. आघाडी करून लढल्याने मतविभागणी रोखता येईल. अन्यथा तुला नाही मला, दे तिसऱ्याला असं होईल, असे अजित पवार म्हणाले.