रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला ‘हा’ विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील – मुख्यमंत्री ठाकरे

रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला ‘हा’ विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील – मुख्यमंत्री ठाकरे

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात शानदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. या सामन्यात महत्त्वाची बाब म्हणजे ‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाची विजयाची परंपरा भारताने ब्रेक करून २-१ मालिका जिंकली. विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अभिमान व्यक्त केला आहे.

भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयासह मालिका जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. “गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील,” असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

पहिल्या झालेल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील भारतीय संघाने जिद्दीच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली. धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय संघाने या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापित केला ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला आहे. या विजयासाह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघानं फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत कसोटी मालिकेवर नाव कोरलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: