देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. सकाळी १०.२० वाजता इंग्रजीमध्ये सर्वांना एक इमर्जन्सी अलर्ट मिळाला. त्यानंतर काही वेळाने, १०.३१ वाजता मराठीमध्ये देखील पुन्हा एकदा असा अलर्ट मिळाला. सध्याचा अलर्ट हा केवळ चाचणी म्हणून होता, त्यामुळे गोंधळून जाण्याचं किंवा काळजीचं काही कारण नाही.
सरकारकडून अनेकदा नैसर्गिक आपत्ती विषयी एसएमएस पाठवून सूचना दिली जाते. मात्र लोक ते वाचत नाहीत; गांभीर्याने घेत नाहीत; असे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेकांना असे इमर्जन्सीअलर्ट पाठवण्याची ही चाचणी होती, असे सांगितले जात आहे.
यामुळे तुम्ही नेटवर्क कव्हरेजच्या बाहेर असाल, तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर असेल, तरीही तुम्हाला इमर्जन्सी अलर्ट मिळेल. तुमचा फोन व्हायब्रेट होईल.तसेच मोबाईलची रिंगटोन फूल व्हॉल्यूम वर वाजेल. त्यामुळे धोक्याच्या इशाऱ्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकणार नाही.