अजित पवार हे डायनॅमिक मंत्री; त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, चंद्रकांत पाटलांचा टोला

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. आरक्षणा संदर्भात केंद्र सरकारने फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. राज्य सरकारने देखील सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घ्यावा. तसेच मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे डायनॅमिक मंत्री आहेत. त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

पाटील म्हणाले, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र केंद्र सरकारने त्यावर फेरयाचिका दाखल केल्याने त्याला एक गार झुळूक मिळाली आहे. केंद्र सरकारने १०२ घटना दुरुस्तीवर फेरविचार याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच ही फेरी याचिका दाखल करायला हवी होती. मात्र तातडीने केंद्राने ही फेरीयाचिका दाखल केली, याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा एकदा सर्कल सुरू झाले आहे. आरक्षणाचा लढा सुरूच राहणार आहे. न्यायालयीन लढाई सुरूच राहील. मात्र आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकारने मराठा समाजाकडे दुर्लक्ष करू नये, मराठा समाजाला तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर जाहीर करावे. त्यातील अण्णासाहेब पाटील महामंडळाला एक हजार कोटी ची तरतूद असावी. तसेच मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन फीची जबाबदारी यामध्ये असावी. उर्वरित रक्कम ही मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असावी, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Team Global News Marathi: