मुंबई : सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स याच्याने हे सगळे शेफारले आहेत, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना तंबी दिली आहे.
राज ठाकरेंनी फेसबुकवर एक पत्रक शेअर करत सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताकीद दिली आहे. या पत्राद्वारे त्यांनी सोशल मीडियावर विधाने करून पक्षाच्या अडचणी वाढवणाऱ्या नेत्यांना थेट इशारा दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला, माझ्याशी बोला, पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा, पक्षात राहून असे प्रकार केलेत, तर हकालपट्टी अटळ आहे, हे लक्षात ठेवा, असं म्हणत ही समज नाही, तर अंतिम ताकीद आहे, याची नोंद घ्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.