मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येता येत नाही म्हणून केंद्रातील सत्तेचा गैरवापर केला जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरांवर ईडीने छापे घातले त्यावरून पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. बीडचे भाजपाचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवार म्हणाले, की लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा वापर केला जातोय. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळत नाही म्हणून ईडीची कारवाई करण्यात आली. राज्यात सध्या सुरू आहे ते विरोधकांच्या नैराश्याचे प्रतिक आहे. sharad pawar update
लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी राजकीय विरोधकांविरोधात सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. हे योग्य नाही. आमच्या महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष पूर्ण केले. आता आपण पुन्हा सत्तेत येणार नाही हे त्यांना माहिती आहे. यामुळेच केंद्रात असणाऱ्या सत्तेचा ते गैरवापर करताहेत.
महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी केला. आम्ही लोकांची बांधिलकी ठेवतो आहोत. राज्यातील प्रत्येक घटकाला आपल्यासोबत घेत काम करत आहोत. राज्यातील सरकारला सर्वसामान्यांचा पाठिंबा असल्याचा दावा पवारांनी केला.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन – तीन महिन्यांत भाजपाचे सरकार येणार असल्याच्या दावा केल्यासंबंधी विचारण्यात आले असता दानवे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे माहिती नव्हते, असा टोला पवारांनी लगावला. “रावसाहेब दानवे खासदार असून गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात आहेत. पण त्यांचा हा गुण मला माहिती नव्हता. राजकारणात कधीही त्यांना ‘ज्योतिषी’ म्हणून ओळख मिळालेली नाही, पण त्यांच्यात हे कौशल्य आहे हे मला आज कळाले, असे पवार म्हणाले.