आपलं सरकार आलं, हिंदू सणांवरचं संकट टळलं’ भाजपच्या पोस्टरबाजीला शिवसेनेचं सडेतोड प्रतिउत्तर !

आपलं सरकार आलं, हिंदू सणांवरचं संकट टळलं’, अशी पोस्टरबाजी करुन भारतीय जनता पक्षाने थेट शिवसेनेला डिवचण्याचे काम केले होते. गणेशोत्सवात जिकडे तिकडे भाजपने अशा प्रकारची बॅनरबाजी केल्याने उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना जाणून बुजून हिंदू सणांवर बंधने आणली होती, असा प्रचार भाजप करत असल्याचा आरोप होत होता. भाजपच्या याच प्रचाराला शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘देशात लॉकडाऊन कोणी जाहीर केला? थाळ्या वाजवा, दिवे लावा कोणी केलं? उद्धवसाहेबांनी सर्व धर्मीयांचे प्राण वाचवले, सण-उत्सवांना बंदी नव्हती, गर्दीला होती. निदान गणेशोत्सवात तरी खरं बोला, तो विघ्नहर्ता आहे’, अशा शब्दात शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपला सुनावलं आहे.

राज्यभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळतीये. यानिमित्ताने सगळेच राजकीय पक्ष शक्तीप्रदर्शन करत आहेत. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी नेत्यांना गणेशोत्सव म्हणजे नामी संधी असते. याच पार्श्वभूमीवर भाजपने यंदा जिकडे तिकडे शिवसेना पर्यायाने उद्धव ठाकरेंना डिवचणारी बॅनरबाजी केली आहे.आपलं सरकार आलं- हिंदू सणांवरचं विघ्न टळलं, अशा आशयाचे बॅनर लावून तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाणून बुजून हिंदू सणांवर बंधन लादली होती, असाच रोख जाहिरातबाजीतून दिसून येत आहे. भाजपच्या याच टीकेला शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर देताना मोदींनी जाहीर केलेल्या करोना काळातील लॉकडाऊन आणि मोदींचे त्याकाळातील उपक्रमांची आठवण करुन दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी करोना काळात केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य परिषदेने कौतुक केलं. न्यूयॉर्क टाइम्सने कौतुक केलं. इतकंच नव्हे तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कौतुक केलं. देशाच्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव सातत्याने आलं. उद्धवसाहेबांनी सर्वधर्मीयांचे प्राण करोनाच्या कठीण काळाच वाचवले. अशावेळी केंद्रात असलेल्या सरकारने काय केलं तर लॉकडाऊन लावला, टाळ्या-थाळ्या वाजवायला सांगितल्या.दिवे लावायला सांगितले. ठाकरे सरकारच्या काळात सण-उत्सवांना बंदी नव्हती, गर्दीला होती. निदान गणेशोत्सवात तरी खरं बोला, तो विघ्नहर्ता आहे, अशा शब्दात अरविंद सावंत यांनी भाजपच्या प्रचाराला रोखठोक उत्तर दिलंय.

Team Global News Marathi: