“आमदार गेले, मंत्री गेले, सरकार गेले, तरी राऊत अद्याप पवारांची री ओढायचे काही थांबत नाही”

 

मुंबई | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार फटकेबाजी, टोलेबाजी करून सभागृह दणाणून सोडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मात्र हे सरकार किती दिवस टिकणार याविषयी तर्क-वितर्क केले जाताना पाहायला मिळत आहेत. यावरून भाजपने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागतील, असा दावा करताच संजय राऊत यांनीही तशाच प्रकारची विधाने केली. नवे सरकार तात्पुरते असून, गुजरातसह महाराष्ट्रात निवडणुका घेण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच सामना अग्रलेखातूनही शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा हल्लाबोल करत हे सरकार केवळ ६ महिने टिकेल, असा दावा केला आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

आमदार गेले, मंत्री गेले, सरकार गेल तरी अद्याप संजय राऊत हे शरद पवार यांची री ओढायच काही थांबत नाहीत. पवारसाहेब म्हणाले तेच पुढे आज अग्रलेखात. २५ वर्षे मविआ सरकार चालणार असल्याची भविष्यवाणी याच अग्रलेखातून केली होती ती खोटी ठरली हे पण विसरलात, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

Team Global News Marathi: