आघाडीतील आंबेडकरांच्या प्रवेशाबाबत अद्याप चर्चा नाही, अशोक चव्हाण यांची माहिती

 

वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाआघाडीत करायचा की नाही, याबाबत अद्याप राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून ठोस उत्तर आलेले नसताना आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावर भाष्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेसची चर्चा झालेली नाही. शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती झाली आहे. भविष्यात ठाकरे हे महाविकास आघाडीत त्यांना घेण्याबाबत चर्चा करतील आणि त्यानंतरच पुढील दिशा आणि भूमिका ठरेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

भारत राष्ट्र समितीची भूमिका भाजपविरोधी आहे, ते समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे समजते. आम्हीदेखील त्यांचे स्वागत करतो, असेही चव्हाण म्हणाले.केवळ नांदेड जिल्ह्यासाठीच नव्हे तर मराठवाड्यासाठी पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा आहे. बाभळीचे महाराष्ट्रातून वाहून गेलेले पाणी थेट समुद्रात जात आहे. लवादाच्या निर्णयानुसार पाणी सोडावेच लागते.

आज पाणीप्रश्नी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रव्यवहार केला. मीदेखील पाठपुरावा केला. परंतु, मार्ग निघाला नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, त्यांना बोलण्याची संधी मिळाली तर मी निश्चित पाणी प्रश्नावर बोलणार, असे मतही त्यांनी मांडले. बाभळी बंधाऱ्यातून पाणी सोडावे लागते, पुढे ते समुद्रात जाते. त्यामुळे त्याचा कुणालाच फायदा होत नाही. त्यामुळे पाणीप्रश्नावर आपण त्यांच्याशी संवाद साधू, अशी भूमिका चव्हाण यांनी व्यक्त केली.

Team Global News Marathi: