कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ आघाडीचे बडे नेते कोल्हापुरात दाखल झाले होते. महाविकास आघाडीतील तीन पक्षात कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न करा, हे सरकार पडणार नाही, अडीच वर्षे आम्ही टिकलोय, पुढील अडीच वर्षेही आम्ही राहणारच असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोल्हापुरात व्यक्त केला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत थोरात, पाटील यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह अनेकानी भाजपवर जोरदार हल्ला चढविला.
मंत्री जयंत पाटील म्हणाले की, महागाईवर चर्चा न करता सध्या भावनांना हेलकावे देण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. धर्माधर्मात तेढ वाढवलं नाही तर आपला सुपडासाप होईल याची त्यांना भीती आहे, त्यामुळेच सात वर्षे सत्तेत असूनही विकास न केल्याने मतासाठी एका चित्रपटाचे मार्केटिेंग केले जात आहे. ते म्हणाले, कायदा हातात घेऊन विरोधकांना धडा शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऐकत नसतील तर त्यांना अडचणीत आणले जात आहे. दहशतवाद्यांना लावणारे कायदे राजकीय नेत्यांना लावले जात आहेत.