ग्लोबल न्यूज – राज्यात आज 22,084 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली तर, 13,489 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 7 लाख 28 हजार 512 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 10 लाख 37 हजार 765 एवढी झाली असून, राज्यात सध्या 2 लाख 79 हजार 768 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज दिवसभरात 391 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्याचा मृत्यूदर 2.81 टक्के एवढा आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 70.02% झाले आहे.
आजवर तपासण्यात आलेल्या 51 लाख 64 हजार 840 नमुन्यांपैकी 10 लाख 37 हजार 765 (20.09%) सकारात्मक आले आहेत. राज्यात सध्या 16 लाख 52 हजार 955 जण होम क्वारंटाइन आहेत तर, 38 हजार 275 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर ऑक्सिजन मिळावा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहावा याच्या नियंत्रणासाठी जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना करतानाच जिल्हास्तरावर कंट्रोल रूम सुरू करण्यात आले आहेत.
आपत्कालिन परिस्थितीत प्रत्येक महसूल विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी 50 ड्युरा सिलेंडर आणि 200 जम्बो सिलेंडर यांचा राखीव साठा ठेवण्याबाबत विभागीय आयुक्तांना निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.