देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७५०८३ नवे रुग्ण | १०५३ रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली, २२ सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे ९० हजाराहून अधिक रुग्ण सापडणाऱ्या भारताला मंगळवारी काहीसा दिलासा मिळाला आहे. बऱ्याच दिवसानंतर नव्या कोरोना रुग्णांची संख्या ८० हजाराहून खाली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ७५०८३ रुग्ण मिळाले आहेत. तर १०५३ जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५५,६२, ६६४ इतका झाला आहे. यापैकी ९,७५,८६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ४४,९७,८६८ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील एकूण ८८,९३५ लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
मात्र या सर्वामध्ये सर्वात दिलासादायक बाब म्हणजे भारतामध्ये काल दिवसभरात तब्बल एक लाख एक हजार ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ लाख ९७ हजार ८६७ एवढी झाली आहे. तर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून ९ लाख ७५ हजार ८६१ एवढी झाली आहे.
देशात आतापर्यंत कोरोनाच्या संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ८०.१२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १.६० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १८.२८ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार २१ सप्टेंबरपर्यंत देशात सहा कोटी ५३ लाख, २५ हजार ७७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी ९ लाख ३३ हजार, १८५ नमुन्यांची चाचणी ही सोमवारी करण्यात आली.