शिवसेना नावाचा 56 वर्षाचा झंझावात! कशी राहिली आहे शिवसेनेची संघर्षमय राजकीय वाटचाल? वाचा सविस्तर…

शिवसेना नावाचा 56 वर्षाचा झंझावात! कशी राहिली आहे शिवसेनेची राजकीय वाटचाल? वाचा सविस्तर…

शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन महाराष्ट्रासह इतर राज्यात साजरा केला जातो आहे. 56 वर्षांच्या वाटचालीमध्ये शिवसेनेने अनेक चढ-उतार पाहिले. बेळगांवातील सीमावासिय मराठी बांधवांवर होणारे अत्याचार, महाराष्ट्रात परप्रांतियाचे होणारे अनिर्बंध अतिक्रमण, वगैरे वादग्रस्त प्रश्नांविरुद्ध शिवसेना आजपावेतो सतत लढत आली आहे. शिवसेनेने केलेली आंदोलने आणि संघर्ष सर्वांसमक्ष आणि सर्वश्रुत आहे.

मुंबई – शिवसेनेचा आज 56वा वर्धापन दिन महाराष्ट्रासह इतर राज्यात साजरा केला जातो आहे. 56 वर्षांच्या वाटचालीमध्ये शिवसेनेने अनेक चढ-उतार पाहिले. बेळगांवातील सीमावासिय मराठी बांधवांवर होणारे अत्याचार, महाराष्ट्रात परप्रांतियाचे होणारे अनिर्बंध अतिक्रमण, वगैरे वादग्रस्त प्रश्नांविरुद्ध शिवसेना आजपावेतो सतत लढत आली आहे. शिवसेनेने केलेली आंदोलने आणि संघर्ष सर्वांसमक्ष आणि सर्वश्रुत आहे. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे, आता उद्धव ठाकरे यांच्या एकछत्री अंमलाखाली कार्यरत असलेली संघटना राज्याच्या सत्तेतला महत्वाचा पक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या रुपात राज्यात कार्यरत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत.

शिवसेनेने खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवेश केला तो ठाण्यातून. 1967 साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने दमदार पाऊल टाकत यश संपादन केले. पुढे लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला. त्याच्या पुढच्याच वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सर्वत्र दिसू लागल्या. शिवसेनेच्या शाखा म्हणजे सामान्य मराठी मानसाचा आधारस्तंभ होते. रात्री-अपरात्री शिवसैनिक मदतीला धावून येतो, अशी त्याची ख्याती होती. एक संघटना ते मोठा राजकीय पक्ष अशी शिवसेनेने मजल मारली.

1989 साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली. ती 25 वर्षे टिकली. सन 1995 साली शिवसेना आणि भाजपा युतीची पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता आली. शिवसेनेचे मनोहर जोशी या पक्षाचे आणि या युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी यांच्यानंतर अल्पकाळासाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. तर 2014 साली भाजप आणि शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या. त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. दरम्यान, भाजपला पाठिंबा दिल्याने देवेंद्र फडणवीस हे युतीचे तिसरे मुख्यमंत्री झाले. मात्र, 2019 साली झालेल्या विधान सभा निवडणुकीनंतर फडणवीस यांनी शिवसेनेला डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या सोबत हातमिळवणी करत, सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवघ्या दीड दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी करत देवेंद्र फडणवीस यांना सत्तेच्या पटलावरून खड्यासारखे उचलून बाजूला केले. भाजपकडून यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीकास्त्र आणि विविध कथित आरोपांचा भडिमार सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर देऊन राज्याचा कारभार व्यवस्थित हाताळत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात कोरोनासारख्या भयंकर महामारीच्या संकटाने राज्यासह देशाला आणि जगाला हादरवले. सुमारे शंभर वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यात आणि देशात मृत्यूचे तांडव बघायला मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातला बराचसा वेळ, सरकारी पैसा, यंत्रणा आणि ऊर्जा या महामारीत वाया गेली. उद्धव ठाकरे यांनी धीराने आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकार्‍यांना सोबत घेऊन या समस्येतून वाट काढायचा प्रयत्न केला. जागतिक स्तरावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कामांची दखल घेतली गेली. सुमारे अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राजकीय खेळपट्टीवर स्थिरावले आहेत. खरंतर उद्धव ठाकरे तेल लावलेल्या राजकीय कुस्तीगीरांच्या फडात नवखे आहेत. तरीही यशस्वीपणे एकापाठोपाठ एक डाव जिंकत आहेत. चर्चा, समित्या, अभ्यासगट, अहवाल, पाहणी दौरे यांच्या पलिकडे जाऊन शिवसेनेने वाटचाल केली आहे. या वाटचालीत निष्ठावंत शिवसैनिकांचे योगदान मोठ आहे.

सध्या पक्षप्रमुख उद्धव यांच्या खांद्याला खांदा लाऊन त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रीय आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कॅबिनेट मंत्रीपदाबरोबरच ते मुंबई महानगरपालिकेच्या कारभारातही बारीक लक्ष घालत आहेत. नुकताच अयोध्याचा दौरा केला आहे. शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक अयोध्येत गेले होते. जोरदार शक्तीप्रदर्शन यावेळी केले. आयुष्यभर शिस्तीने मातोश्रीतील ठाकरेंचा आदेश पाळणार्‍यांचा खूप मोठा वर्ग शिवसेनेत आजही आहे. वेळोवेळी याचा प्रत्यय दिसून येतो.

राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले होते. शिवसेनेचे हिंदुत्व बेगडी असल्याचे डिवचले गेले. परंतु, कडवट हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रीयत्व हा शिवसेनेचा कायम अजेंडा राहिला आहे. त्यातूनच जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांना आळा घालत नाही, तोपर्यंत पाकिस्तानी खेळाडू आणि कलाकारांना महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देणार नाही, अशी गर्जना शिवसेनेने वेळोवेळी केली. त्यासाठी वानखेडे मैदानाची कडेकोट सुरक्षा भेदून खेळपट्टी उखडणं, बैठक उधळणं अशी प्रखर आंदोलनं शिवसेनेने केली. पाकिस्तानी कसुरींच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सुधींद्र कुलकर्णींना काळी शाई फासून निषेध करणारी शिवसेनाच होती. यामुळेच आज भारत-पाक सामने होत नाहीत. शिवाय पाकिस्तानी व्यक्तीला महाराष्ट्रात आणण्याचे धाडस कोणी दाखवत नाही, हा शिवसेनेचा इतिहास आहे. शिवाय, हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हटलं की जगभरातल्या हिंदुंसमोर शिवसेनाच उभी राहते.

शिवसेना नेते सुभाष देसाई, दीपक केसरकर, दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत आदी ज्येष्ठ नेते पहिल्या फळीतील शिवसैनिक. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकाळात शिवसेनेची पाळेमुळे गावपातळी आणि शहरी भागात घट्ट रोवण्यात महत्वाची भूमिका निभावली. सध्या शिवसेनेत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर जोडला गेला आहे. तरुण वर्गाला पुढे आणण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शकाची भूमिका निभावण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, जुने शिवसैनिक आणि नेते दुखावणार नाहीत याची काळजी आदित्य ठाकरे घ्यावी लागणार आहे. तसेच बदलणार्‍या काळाबरोबर राजकारणाची परिभाषा आणि नव तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे, त्याची जोड देऊन संघटनेची व्याप्ती आणि विशेष म्हणजे संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यामधला दुवा होण्याचं काम आदित्य ठाकरे यांना खर्‍याखुर्‍या अर्थाने करावे लागेल.

थोडक्यात घटना अन घडामोडी

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने महाराष्ट्रात मोदी लाटेमुळे ४८ पैकी तब्बल ४२ जागा जिंकून विक्रम केला. या निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले

२३ जानेवारी २०१३ रोजी शिवसेना भवनात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे उपनेते, खासदार, आमदार, पदाधिकारी असे सुमारे दोनशे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली.

२००७ची मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई होती. कारण, एकतर शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्य़ा मनसेने चांगलेस बाळसे धरण्यास सुरुवात केली होती. शिवसेना महापालिकेवरची सत्ता टिकवणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावेळी मुंबईकरांनी शिवसेना-भाजपाच्या पदरात १११ जागा टाकून मुंबईवरचा भगवा कायम ठेवला. शिवसेनेला ८३ तर भाजपाला २८ जागा मिळाल्या.

19 जून 1966 रोजी सहदेव नाईक यांनी नारळ फोडून शिवसेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केले. तर प्रबोधनकारांच्या हस्ते शिवसेनेच्या सभासद नोंदणीचे तक्ते देण्यास सुरुवात झाली.

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत संघ परिवाराने सुरु केलेल्या कार सेवच्या माध्यमातून जमलेल्या लाखो कार सेवकांनी बाबरी जमीनदोस्त केली. पण त्याची जबाबदारी घ्यायला संघ परिवार तयार नव्हता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनीच ती जबाबदारी स्वीकारली आणि शिवसैनिकांनीच बाबरी मशीद पाडल्याचं जाहीर केलं

१७ नोव्हेंबर, २०१२ रोजी दुपारी ३ वाजून ३३ मिनिटांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. १८ नोव्हेंबर, २०१२ बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी लोटली होती. हजारो शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले होते.

२०१५ ची विधानसभा निवडणुकीत जागांच्या वाटाघाटीवरून शिवसेना-भाजपची अभेद्य युती तुटली. ही निवडणूक शिवसेनेला एकट्याने लढावी लागली. या निवडणुकीत शिवसेनेचे ६४ आमदार निवडून आले.

1987 च्या विधानसभेची विलेपार्लेच्या पोटनिवडणूक शिवसेनेने हिंदूत्वच्या मुद्द्यावर लढली. त्यावेळी राज्यात शरद पवारांचे पुलोदचे सरकार अस्तित्वाच होते. शिवसेनेने या निवडणुकीत डॉ. रमेश प्रभू यांना उतरवले होते.

मुंबई महानगरपालिकेच्या 1968 साली झालेली निवडणूक शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्ष या राष्ट्रीय पक्षाबरोबर युती करून लढवली. या युतीसाठी प्रा. मधू दंडवते यांनी पुढाकार घेतला होता. शिवसेना-प्रजा समाजवादी पक्षाच्या युतीला मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. शिवसेनेने या निवडणुकीत 42 जागांवर विजय मिळवला, तर युतीतील भागीदार प्रजा समाजवादी पक्षाला 11 जागा मिळाल्या.

१९९७चा काळ शिवसेना-भाजप युतीचा सुवर्ण काळच होता. राज्यातील ९ महानगरपालिका आणि सर्व जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. या सर्व निवडणूका शिवसेना-भाजपा युती म्हणूनच लढविणार असल्याचा निर्णय शिवसेनाप्रमुख आणि प्रमोद महाजन यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केला. निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यावेळी मुंबई महापालिकेतील १६९ जागांपैकी शिवसेना-भाजपा युतीला १०८ जागा मिळाल्या. तर ठाणे, उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना-भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांतही १० जिल्हा परिषदा शिवसेना-भाजपाला मिळाल्या.

30 ऑक्टोबर 1966 या दिवशी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा दादरमधील शिवाजी पार्कवर संपन्न झाला. या मेळाव्याला बाळासाहेबांचे बंधू श्रीकांत ठाकरे, रामराव आदीक, प्रा. स.अ. रानडे, अॅड. बळवंत मंत्री आणि बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे उपस्थित होते.

२००२ मध्ये झालेल्या मुंबई, ठाणे आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीने भगवा फडकवला.

१९९५च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने सोबत युती केली. या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीला १३४ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला केवळ ८४ जागी यश मिळाले. शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

1967 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ठाणे महानगरपालिकेवर पहिल्यांदा आपला भगवा फडकवला. या निवडणुकीत शिवसेनेने 40 पैकी 17 जागांवर विजय मिळवला होता. (फोटो सौजन्य : शिवसेना संकेतस्थळ)

ग्लोबल न्युज नेटवर्क: