ठाणे । प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील संचलनात महाराष्ट्र आणि बंगालचा चित्ररथ नाकारल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ हा दिल्लीतील संचालनाचे मुख्य आकर्षण ठरत असून तब्बल चार वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा मान पटकावला आहे. यावर्षी महाराष्ट्राने सुचवलेल्या चित्ररथ विषयांमधून एकही विषय मान्य करण्यात न आल्याने यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. दिल्लीश्वरांच्या या मनमानी मुळे मोठा वाद निर्माण झाला असून केंद्राच्या या निर्णयामुळे संतापलेल्या ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस ने आज मोठी निदर्शने केली.
ठाण्यातील पाचपाखाडी येथील पक्ष कार्यालयासमोर केंद्रातील भाजप सरकार व मोदी शहा यांचा जाहीर निषेध केला. महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला तर नाहीच उलट दिल्लीवर आलेले संकट नेहमी महाराष्ट्रानेच परतवून लावले आहेत अशी परखड टीका ठाणे राष्ट्रवादी अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल येथील भाजप सरकार पडल्यामुळेच सूडबुद्धीने हे कृत्य केल्याची टीका त्यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि नेते हजर होते. मोदी आणि शहा यांचा निषेध करत सर्वांनी महाराष्ट्रावरील या अन्यायाचा निषेध केला.