नवी दिल्ली । देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात आरोग्य क्षेत्र, जलशक्ती मिशन, ग्रामीण भागात ब्रॉडबँड, फायबर कनेक्टिव्हिटी आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती या मुद्द्यांवर भाष्य केले.
प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, ‘देशाच्या प्रगतीसाठी बदल आवश्यक आहेत. आम्हाला आपल्या देशासाठी विकासाची नवी शिखरे पादाक्रांत करायची आहेत. देशातील 130 कोटी लोकांनी मिळून हे करायचे आहे. देशाचा पंतप्रधानही देशाच एक पुत्र आहे. येणाऱ्या काळात आपल्याला ही कामे करायची आहेत.
पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा
- 1.5 लाख आरोग्य केंद्रे बनवावी लागतील.
- दर तीन लोकसभा मतदारसंघांदरम्यान एका मेडिकल कॉलेजची स्थापना करावी लागेल.
- 2 कोटींहून अधिक जनतेसाठी घरे बांधायची आहेत.
- 15 कोटी घरांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचवायचे आहे.
- सव्वा लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते बनवायचे आहेत.
- प्रत्येक गाव ब्रॉडबंड आणि फायबर कनेक्टिव्हिटीने जोडायचे आहे.
- 50 हजारांहून जास्त नवे स्टार्टअपचे जाळे निर्माण करायचे आहे.
प्रत्येक घरात पाण्यासाठी पंतप्रधानांची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून म्हटले की, आमच्या सरकारने देशातील गरिबी कमी करण्याच्या दिशेने पाऊले उचलली आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आतापर्यंत प्रत्येक दलाच्या सरकारने देशाच्या भल्यासाठी काही ना काही केले आहे. परंतु आतापर्यंत 50 टक्के जनतेच्या घरात पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
पीएम मोदी म्हणाले की, आमचे सरकार आता ‘हर घर जल’कडे वाटचाल करत आहे. पंतप्रधानांनी यादरम्यान जलजीवन मिशन आणि साडेतीन लाख कोटी रुपयांच्या बजेटची घोषणा केली. याअंतर्गत जलसंचय, समुद्राच्या पाण्याचा वापर, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि कमी पाण्यात शेतीसाठी
जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी यादरम्यान म्हटले की, एका संताने शंभर वर्षांपूर्वीच म्हटले होते की, एक दिवस असा येईल जेव्हा पाण्याची किराणा दुकानात विक्री होईल.