झपाट्याने वाढलेल्या बार्शी शहरातील विस्तारित हद्दवाढ भागात कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली — राजेंद्र राऊत
बार्शी: मागील पंधरा वर्षांपासून बार्शी शहराचा विस्तार होऊन ते झपाट्याने वाढलेले असून, या हद्दवाढ भागात नागरिकांना प्राथमिक गरजा व सुख-सोयी, सुविधा देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणून अनेक विकास कामे केलेली असून उर्वरित विकासकामेही भविष्यात सुरूच राहतील. जेणेकरून या भागातील नागरिकांना परिपूर्ण सोयी सुविधा देण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून कटिबद्ध आहोत असे अभिवचन अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दिले.
बार्शी शहरातील उपळाई रोड येथील जाहीर सभेत पुढे बोलताना राजेंद्र राऊत म्हणाले, या भागातील नागरिकांसाठी रस्ते, गटारी, वीज, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्यासाठी भुयारी गटार योजना, कचऱ्याची विल्हेवाट लावणे व स्वच्छतेसाठी घंटागाडी आदी गोष्टीं आम्ही नगरपरिषद निवडणुकीत दिलेल्या वचननामा प्रमाणे आजपर्यंत 90 टक्के पूर्ण केलेल्या आहेत. उर्वरित काही सुविधा या येणाऱ्या सहा महिन्यांत पूर्ण होऊन हद्दवाढ भाग हा सर्व सोयींनी युक्त परिपूर्ण झालेला असेल.
बार्शी शहरात व या भागात भुयारी गटारीचे काम सुरू असताना खराब झालेले रस्ते नविन करण्यात येणार आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध असून काही भागांत रस्त्यांची कामे सुरू आहेत व उर्वरित भागातीलही रस्ते नवीन करण्यात येतील, त्यामुळे या भागातील रस्ते पुन्हा नव्याने तयार होणार आहेत. या हद्दवाढ भागात नागरी सुविधा देण्याबरोबरच या भागात बेरोजगार तरुणांसाठी व्यापारी संकुलाचे निर्माण केलेले आहे. जेणेकरून या व्यापारी संकुलात छोटे मोठे उद्योग-व्यवसाय सुरू होऊन त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागून या भागात आर्थिक चालना मिळेल.
त्याचप्रमाणे या भागात अबालवृद्ध,बालगोपाल, माता भगिनींसाठी बगीच्यांचे निर्माण व दुरुस्ती करून आपल्या कुटुंबासोबत आनंदी वेळ घालविण्यासाठी चांगल्या सुविधा देत आहेत. या सुविधा देत असताना आपल्या बार्शी शहराचा सर्वांगीण विकास होऊन शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील व कटिबद्ध आहोत,यासाठी तुमचीही आम्हांला साथ हवी. स्वच्छ व सुंदर बार्शीसाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र काम करू व आपली बार्शी विकासाच्या प्रगतीपथावर नेऊ असे आवाहन राजेंद्र राऊत यांनी केले. बार्शीच्या विकासासाठी या विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी मला मतदान रुपये आशीर्वाद देऊन विजयी करण्याचे आवाहन व विनंती केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारबोले, नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,रमेश पाटील,प्रशांत कथले,बप्पासाहेब गव्हाणे,नवनाथ चांदणे,हरिभाऊ कोळेकर,छोटूभाऊ लोहे,मेजर मोरे,विजय नाना राऊत आदींनी आपले मनोगते व्यक्त केली. यावेळी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
आसिफ तांबोळी यांनी आपल्या भाषणात शहरात आम्ही कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. आजवर बार्शीकर जनतेला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून हे पार्सल पुण्याला पाठवा असे ते म्हणाले.