सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे.तसेच ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे.
दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दि. १०.०९.२०१९ रोजीच्या पत्रामध्ये, “आपण व माझे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय आ. अजितदादा पवार साहेब यांनी आत्तापर्यंत विश्वासाने दिलेली पक्षाची जबाबदारी मी त्याच विश्वासाने व प्रामाणिकपणे पार पडलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगोला तालुक्यातील कार्यकर्त्यांची मी सांगोला विधानसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेला लढवावी अशी सततची आग्रही मागणी व कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा आहे.
मी आपणाकडे सांगोला विधानसभेच्या तिकीटाची मागणी केलेली आहे. पक्षाकडून व आपणाकडून मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. तथापि, सांगोला विधानसभेच्या निवडणुकीच्या कामकाजामुळे मला सांगोला तालुक्यामध्येच भरपूर वेळ द्यावा लागणार असल्यामुळे जिल्ह्यातील पक्षाच्या कामाला मला वेळ देणे अशक्यप्राय आहे.
त्यामुळे मी आज या पत्राद्वारे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तरी कृपया याचा स्वीकार व्हावा व सदरच्या जबाबदारीतून मला मुक्त करण्यात यावे, ही विनंती.”
अश्या आशयाचे पत्र दीपकआबांनी पाठविले असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीच्या गोटामध्ये खळबळ माजलेली आहे.
सांगोला विधानसभची जागा शिवसेनेच्या वाटयाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून साळुंखे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.