मुंबई । बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यावेळची निवडणूक कधी नव्हे एवढी उत्कंठावर्धक बनली आहे. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक कमालीची वाढली असून सातारा लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाकडे सार्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
बहुतांश ठिकाणी चुरशीने मतदान झाले असल्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, मतदारांचा कानोसा घेतला असता येणारा निकाल काही ठिकाणी धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीसह जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले आहे. मतमोजणी गुरुवारी (ता. 24) सातारा येथे औद्योगिक वसाहतीत होणार आहे. अवघे दोन दिवस मतमोजणीस राहिले असल्यामुळे उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने श्रीनिवास पाटील यांच्यासाठी सर्वच ताकद पणाला लावली, तर भाजपने उदयनराजे भोसले यांच्यासाठी जोर लावला.
सातारा: यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. शिवाय, उदयनराजे यांच्या “कॉलर’ उडविण्याच्या स्टाईलमुळे आणि श्रीनिवास पाटील यांच्या मिशीमुळे ही लढाई सांकेतिक भाषेत “कॉलर विरुध्द मिशी’ अशी बनली आहे. यात कोण जिंकणार, हे राज्याच्या राजकीय वर्तुळातही महत्त्वपूर्ण लढत ठरली आहे.
सातारा जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या आठ मतदारसंघांत सार्वत्रिक निवडणूक झाली. सर्वच मतदारसंघांत चुरस पाहायला मिळाली. लोकसभा पोटनिवडणुकीचे 7 आणि आठ विधानसभा मतदारसंघातील 73 अशा 80 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. लोकसभेसाठी 67.15 टक्के तर विधानसभेसाठी 66.57 टक्के मतदान झाले आहे. मतदान प्रक्रियेचा हा टप्पा पार पडल्यानंतर आता सर्वांनाच उत्सुकता आहे ती निकालाची. यावेळी लोकसभेसह जिल्ह्यात बहुतेक सर्व विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने मतदान झाल्याने निवडणुकीचा निकाल काय येणार? कोणकोणत्या मतदारसंघात कुणाचं दिवाळं निघणार? या चर्चेने आणि चिंतेने उमेदवारांना पुरते ग्रासले आहे. निकाल उद्यावर येवून ठेपल्याने भावी खासदार व भावी आमदारही निकालाकडे डोळे लावून बसले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी कऱ्हाड दक्षिण, माणमध्ये तिरंगी, तर इतरत्र थेट दुरंगी सामना आहे. त्यामुळे सर्वच मतदारसंघांत निकालाबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असल्याने या जिल्ह्यात राष्ट्रवादीची काय अवस्था होणार, यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताकदीवरही चर्चा होणार आहे. परिणामी, लोकसभेसह आठही विधानसभा मतदारसंघांतील निकालाबाबत सर्वत्र चर्चा झडू लागल्या आहेत.
दोन्ही उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते तर आपल्याच उमेदवाराचा विजय होणार, यातून पैजा लावू लागले आहेत. त्यामुळे जेवणासह दिवाळीसाठी भेटवस्तू देणे यापर्यंत पैजा लावल्या जात आहेत. मात्र, कार्यकर्ते, सर्वसामान्यांकडून वेगवेगळ्या चर्चा ऐकण्यास मिळत असल्याने पैजा लावणाऱ्यांचे धाबेही दणाणू लागले आहेत. शिवाय, उमेदवारही कोणत्या मतदारसंघात, गावात, गटांत, शहरातील किती मते मिळणार, याचे अंदाज बांधण्यात व्यस्त आहेत.
लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकल्यानंतर अवघ्या चारच महिन्यात आपल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि साताऱ्यातून पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार सातारा लोकसभेची पोटनिवडणूककही विधानसभेसोबत झाली. त्यामुळे विधानसभेत सोबतच सातारा पोटनिवडणूकीकडे ही साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचे समर्थकही पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करीत आहेत. श्रीनिवास पाटील यांच्या समर्थकांच्या मते, विधानसभेच्या सहा मतदारसंघांपैकी कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांना एक ते सव्वा लाख मतांचे मताधिक्य मिळेल.
याशिवाय, कोरेगाव आणि वाई मतदारसंघातून ही प्रत्येकी 15 ते 20 हजारांचे मताधिक्य मिळेल. सातारा विधानसभा मतदार संघात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची ताकद वाढली असली तरी, श्रीनिवास पाटील यांचे हे सव्वा ते दीड लाखाचे मताधिक्य उदयनराजे यांना सातारा मतदारसंघातून तुटणार नाही आणि श्रीनिवास पाटील यांचा सहज विजयी होईल