सर्वांच्या नजरा आता 12 डिसेंबर कडे; काय बोलणार पंकजा मुंडे,वाचा सविस्तर-

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज सकाळी एक फेसबुक पोस्ट केली असून ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं?, यासंबंधी मी १२ डिसेंबर रोजी सांगणार आहे, असे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. पंकजाच्या या पोस्टमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. परळी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा १२ डिसेंबर रोजी काय बोलणार याकडे आता अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.


परळी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. पकंजा यांना पराभवाचा धक्का बसल्याने आता पुढची रणनीती काय?, यासंबंधी त्या १२ डिसेंबर म्हणजेच वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरवणार असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून सांगितले आहे. 

काय म्हणाल्या पंकजाताई…

नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे…

”निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.

दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले.’आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:’ हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.

पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. “ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,” ..”ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या “…किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .

मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: