सरकारला जागे करण्यासाठी भाजपाने पुकारले “महाराष्ट्र बचाव” आंदोलन
सुरज गायकवाड
ग्लोबल न्युज: राज्याच्या राजकारणात उदयास आलेले महाविकास आघाडी सरकार या कोरोनाच्या संकटात सपशेल निष्क्रिय ठरताना दिसत आहे आता या सरकारला काम करण्यास प्रवृत्त करण्यासाठी राज्यातील भाजपा पक्षाने आंदोलनाची हाक दिली आहे.आजपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.
महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मंगळवारी भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मुख्यमंत्री तसेच राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी व तहसिलदारांना निवेदन देणार आहेत. तर शुक्रवार, दि. २२ रोजी लाखो कार्यकर्ते आपापल्या घराबाहेर हातात फलक घेऊन उभे राहतील व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करतील, असे भाजपा नेत्यांकडून सांगण्यात आले.
याबाबत माहिती देताना विरोशी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र व मुंबईत कोरोनाची समस्या हाताबाहेर गेली अशी स्थिती आहे. जबाबदारी घेऊन कोण निर्णय घेत आहे, असा प्रश्न पडतो. राज्यात सर्व काही भगवान भरोसे असल्यासारखी स्थिती आहे. ज्यांना कोरोनाची लागण झाली त्यांना रुग्णालयात प्रवेश मिळून उपचार मिळणे अवघड झाले आहे. गावोगावी अनेक अडचणी आहेत. गरीबांचे, मजूरांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. तसेच कोणत्याही प्रश्नावर राज्य सरकार ठोस भूमिका घेत नाही आशा प्रश्नांवर भाजपा आंदोलन करणार आहे.