जळगाव । विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जिल्ह्यात आलेले शरद पवार यांनी आज सकाळी जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. दरम्यान, यावेळी त्यांना मुक्ताईनगरात राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराने माघार का घेतली? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, भाजप आणि शिवसेना यांचे वर्चस्व कमी करण्यासाठी आम्हाला तोडजोड करावी लागली.
मुक्ताईनगर मधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांची माघार ही जाणीवपूर्वक केलेली आहे. या मतदार संघात आमच्या उमेदवारापेक्षा दुसरा कोणी विरोधी उमेदवार प्रभावी ठरेल म्हणून आम्ही तडजोड जाणीवपूर्वक केली आहे, असे ते म्हणाले.
सत्तेचा गैरवापर करणाऱ्या भाजप, शिवसेना सरकारला यावेळी काहीही झालं तरी आम्ही सत्तेवरून खाली खेचणार आहोत. त्यासाठी आम्ही काही ठिकाणी जाणीवपूर्वक तडजोडी केल्या आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना केले.
दरम्यान, ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे, सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत अशा शब्दात शरद पवार यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सुशीकुमार शिंदेंना उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत सुशीलकुमार शिंदे सांगू शकत नाहीत, ते काँग्रेस पक्षाबाबत सांगू शकतात असेही पवार म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एक होणार आहेत, आम्ही एकाच आईची लेकरे आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर दोन्ही पक्ष वाढलेले आहेत असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते.
खडसेंच्या कन्या निवडणूक लढवत असलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अॅड. रवींद्र पाटील यांनीही धक्कादायक माघार घेतली आहे. पक्ष आदेश असल्याने माघार घेण्याचे त्यांनी सांगितले. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना पवारांनी याचं कारण सांगितलं.
राज्यातील काही मतदारसंघातून अशा उमेदवारी माघार घेण्यात आल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र बदलले असून, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांची आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या भाजप उमेदवार रोहिनी खडसे यांच्यात सरळ-सरळ लढत रंगणार आहे. दुसरीकडे पक्षाकडून माघारीचे आदेश आल्याने स्वत: रवींद्र पाटील हे पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे पाठविणार असल्याची भूमिका मांडली होती.
तर राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी विनोद तराळ यांनी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या जळगाव दौऱ्यात विधासनभा निवडणुकांमधील माघार याबद्दल भाष्य केले.