राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गंभीर बाब म्हणजे यामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला असून लाखो शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अशा वेळी पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वेळेवर मिळणे अत्यावश्यक आहे.
मात्र अनेक शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे कसे मिळवायचे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कुठे आणि कोणत्या कंपनीकडे अर्ज करायचा, त्याची प्रक्रिया कशी आहे याची माहिती नाही. त्यामुळे त्यांना पिक विम्याचे पैसे मिळवण्यास अडचण निर्माण होते. शेतकऱ्यांचा हा मार्ग सुकर व्हावा यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते शार्दुल देशपांडे यांनी सरकारकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवून ती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
शेतकऱ्यांनो अतिवृष्टी / अवेळी पावसामुळे झालेली पिकांची नुकसानभरपाई मिळण्यासाठी हे करावे लागेल
‘राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या बाजरी, सोयाबीन, कापूस, या पिकांचे वेगवेगळ्या प्रकारे नुकसान झालेले आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करणे हे शासन निर्णयामध्ये स्पष्ट केले आहे, अशी माहिती शार्दुल देशपांडे यांनी दिली आहे.
‘शासन निर्णयानुसार विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्याने किंवा पीक कापणीपासून जास्तीत जास्त 14 दिवसांत अतिवृष्टीमळे/पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. सदरील शेतकऱ्यांचे वैयक्तिक पंचनामे करण्यात यावेत असा शासन निर्णय आहे. यासाठी पात्र शेतकऱ्याला पिकाचे नुकसान झाल्यापासून 48 तासांच्या आत संबंधित नुकसानीची माहिती ही विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी खाते/महसूल खाते (तहसीलदार) किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून द्यावी लागेल अशा प्रकारे माहिती दिलेले शेतकरीच नुकसानभरपाईस पात्र असतील, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पिक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी कर्जदार शेतकरी आणि बिगर-कर्जदार शेतकऱ्यांनी अवलंबवायची कार्यपद्धत वेगवेगळी असल्याचे ही त्यांनी सांगितले. या दोन्ही कार्यपद्धतींची माहिती त्यांनी पुढे दिली आहे.
कर्जदार शेतकऱ्यांनी अवलंबवायची कार्यपद्धत :
कर्जदार शेतकऱ्यांनी ज्या बँकेत त्यांचे कर्ज खाते आहे तसेच जिथे पीक विमा भरलेला आहे, त्या बँकेला आपल्या पिकाच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत लिखित स्वरूपात माहिती द्यावी आणि त्यांची रिसिव्ह कॉपी आपल्याकडे ठेवावी तसेच एक प्रत महसूल किंवा कृषी विभागाला द्यावी आणि त्यांची रिसिव्ह कॉपी आपल्याकडे ठेवावी. तसेच विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून त्यांना कळवावे.
बिगर-कर्जदार शेतकऱ्यांनी अवलंबवायची कार्यपद्धत :
बिगर-कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत माहिती लिखित स्वरूपात महसूल किंवा कृषी विभागाला द्यावी आणि त्यांची रिसिव्ह कॉपी आपल्याकडे ठेवावी. तसेच विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून त्यांना कळवावे.
पिक नुकसान सूचना फॉर्मबाबत :
अतिवृष्टी/ अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे जे नुकसान झालेले आहे, त्याची माहिती नुकसान झाल्यापासून 48 तासांमध्ये विहीत अर्जाद्वारे राज्य शासन यांना कळविणे आवश्यक आहे.
पिक नुकसान सूचना अर्जासाठी आपल्याशी संपर्क साधता येईल, असेही शार्दूल देशपांडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मोफत अर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले. यासाठी 9960420388 या व्हॉट्सअॅपवर संपर्क साधावा किंवा [email protected] या ई-मेल द्वारे संपर्क करावा.
योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा
राज्यात खरीप हंगाम 2019-20 मध्ये सदरची योजना खाली नमुद केलेल्या विमा कंपनीकडून संबंधित जिल्हा समूहामध्ये राबविण्यात येईल.