शेतकऱ्यांच्या सेवेसाठी जनआशीर्वाद यात्रा! – आदित्य ठाकरे

मुक्रमाबाद:

खरी पूजा करायची असेल तर दीनदुबळ्यांसह शेतकऱ्याची सेवा करा, असे माझे आजोबा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले आहे. यासाठी मी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेना पक्षाला मतदान केले, अशा मतदार बांधवांचे आभार मानण्यासाठी मुक्रमाबाद  ता मुखेड येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सचिन अहिर, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आमदार सुभाष साबणे, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उदगीर येथील कार्यक्रम आटोपून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे मुक्रमाबाद शहरात आगमन होताच ढोलताशा, लेझीम पथक व महिला डोक्यावर कलश घेऊन सभामंडपापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.

गतवर्षीचा पीक विमा शेतकऱ्याना मिळण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करीत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. पाऊस असतानादेखील मोठ्या संख्येने शेतकऱ्यासह नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिवसेनेचे बालाजी पा. कबनूरकर, बालाजी पसरगे, मनोज जाधव, अतुल सुनेवाड, राहुल इंदुरे, राजरत्न गुमडे, विजय शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: