२०१९ च्या लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना ‘दी क्विंट’ या हिंदी न्युज पोर्टलवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत सुरू होती. ही मुलाखत संपादकीय संचालक संजय पुगालिया घेत होते. या मुलाखतीतील एक किस्सा शरद पवार आणि राजकारण यांचा संबंध किती जवळचा आहे हे अधोरेखित करणारा होता. शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार या पुणे जिल्हा परिषदेच्या लोकल बोर्ड सदस्य होत्या. पवारांचा जन्म झाला आणि तिसऱ्या दिवशी लोकल बोर्डची बैठक होती. शारदाबाई पवार यांना उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यांनी ही तीन दिवसांच्या शरद पवार यांना समवेत घेत लोकल बोर्डाची बैठक गाठली. लोकल बोर्डाच्या प्रत्येक सदस्यांसाठी हा धक्का होता. जन्माच्या तिसऱ्या दिवसांपासून शरद पवार आणि राजकारण हे समीकरण आहे, याचा उलगडा या मुलाखतीतून झाला होता.
असे हे शरद पवार..!
त्यांच्या वयाच्या मानाने कितीतरी पटीने अधिक प्रगल्भ आहेत. राजकारणातील शिष्टाचार, नम्रता, विनयशीलता, सकारात्मकता ही त्यांची खासियत आहे. अहंकारापासून कोसो दूर असणारा हा माणूस सत्ता असो अथवा नसो सातत्याने चर्चेत राहतो, हेच विशेष मानावे लागेल. या सर्व गोष्टी आता पुन्हा चर्चेत येऊ लागल्या आहेत कारण त्याला आता महाराष्ट्राचे राजकारण निमित्त ठरले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकटे शरद पवार तीन राजकीय पक्षांच्या प्रमुखपदाची जबाबदारी घेऊन पुढे जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा शब्द तर अंतिम मानलाच जातो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात ही मंडळी सुद्धा शरद पवार यांच्या सल्ल्याने पुढे जात आहे. काँग्रेसचे तरुण आमदार शरद पवार यांनाच आपला नेता मानू लागले आहेत. राज्यसभा सदस्य आणि शिवसेनेचे ‘चाणक्य’ संजय राऊत हे शरद पावरांच्या ‘सिल्वर ओक’ निवासस्थानातून बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांची सकाळ, दुपार, संध्याकाळ तिथेच आहे. पवारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही राग शांत करून त्यांना आपल्या बरोबर घेतले. समवेत असणाऱ्या अन्य घटक पक्षांनाही कोणता पर्याय ठेवला नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असे घडत आहे आणि संपूर्ण देश ते पाहत आहे. शरद पवार यांनी सर्व देशाच्या नजरा आपल्याभोवती खिळवून ठेवल्या आहेत. गेमचेंजर काय असतो हे त्यांनी खास करून भाजपचे अमित शहा यांना दाखवून दिले. पवारांचे राजकीय कसब पाहून अमित शहांना तर आता मुंबई दौऱ्यावर येण्याचीही भीती वाटू लागली आहे, असे सांगण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर त्यांनी थेट जमिनीवर आणले आहे. भाजपच्या अन्य नेत्यांचे चेहऱ्यावरील खोटे-खोटे हसे पाहून लोकांना उबग येऊ लागली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकालानंतर गेल्या काही दिवसांत जे काही घडले ते फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या अचाट, अफाट कल्पकतेतून पुढे आलेले राजकारण आहे. राजकारणात कधी कोणता डाव टाकायचा आणि विरोधकांना कसे नामोहरम करायचे याचे परफेक्ट तंत्र शरद पवार यांनी अवगत केले असल्याचे गेले पंधरा दिवस संपूर्ण देश पाहत आहे. ‘मोदी हैं तो मुमकीन हैं’, म्हणणारे आणि स्वतःला फोडाफोडीच्या राजकारणात किंग समजणारे अमित शहा, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन तसेच भाजपच्या अनेक नेत्यांना अजूनही तुम्ही राजकारणात विद्यार्थीच आहात आणि मी राजकारणातील विद्यापीठाचा कुलगुरू आहे याची जाणीव पवारांनी करून दिली आहे. ‘शरद पवार संपले’, ‘शरद पवारांचे राजकारण संपले’, ‘पवारांचे राजकारण आम्ही संपवले’, असे म्हणाऱ्या भाजप नेत्यांचे तर पवारांनी गेल्या पंधरा दिवसांत वारंवार थोबाड फोडले आहे. आजही तीच परिस्थिती आहे.
गेल्या पंधरा दिवसांत त्यांनी स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेळ कमी दिला मात्र, राज्यसभा सदस्य आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या सोबत त्यांनी बराच वेळ घालवला. तेल लावलेला पहिलवान कुस्ती न खेळता सुद्धा कसा डाव टाकतो आणि भल्याभल्यांना कसा चितपट करतो, हे भाजपच्या अनेक नेत्यांना दाखवून दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचे उदाहरण आहे. मी पुन्हा येईन..!, मी पुन्हा येईन..!, असे ओरडून सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा तर शरद पवारांच्या राजकीय कृतीमुळे घसाच बसला.
वक्त से पहले
हादसों से लडा़ हूँ..!
लोग कहते हैं मुझे
मैं अपनी उम्र से
कई साल बडा हूँ..!
तेरे हर एक वार पर
पलटवार हूँ मैं…
युं नही कहलाता
शरद पवार हूँ मैं..!
या ओळी शरद पवारांना तंतोतंत लागू पडतात. त्याला कारण ही तसेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राहणार की संपणार अशी परिस्थिती असताना पवारांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राष्ट्रवादी पुन्हा जोमाने राज्याच्या राजकारणात चर्चेत आणली. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस सोडून जी मंडळी केवळ मंत्रीपदाच्या लालसेपोटी भाजपमध्ये गेली त्यांचे ही पवारांनी आता अवघड करून टाकले आहे. शिवसेनेला त्यांच्या राजकीय ताकदीची जाणीव करून देत असतानाच ती आता पुन्हा माघारी फिरू शकत नाही, अशी परिस्थिती करून ठेवली. ‘तुम्ही पुन्हा याल, पण मी हयात असेपर्यंत तुमचा राजकारणातील बाप मात्र मीच असेल..!,’ हे शरद पवारांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कृतीतून अनेकांना सांगून टाकले आहे.
महाराष्ट्रात यापुढे अनेक राजकीय स्थित्यंतरे येतील, मात्र २०१४ ची विधानसभा निवडणूक खास करून भाजपच्या प्रत्येक नेत्यांच्या लक्षात राहणार आहे. भाजपची सोशल मीडिया टीम सातत्याने शरद पवार यांच्या विषयी गरळ ओकत आली होती त्याला ही अटकाव बसला. महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुणाई शरद पवार हे नाव मानू लागली. सोशल मीडियावर ‘पवार म्हणजे पॉवर’, ‘फादर ऑफ पॉलिटिक्स,’ असे गुणगान गाऊ लागली. पवारांवर कोणी टीका केली तर तितक्याच ताकदीने तरुणाई पेटून उठू लागली आणि सोशल मीडियावर भाजपच्या विरोधात बोलू लागली, प्रत्यक्षात कृती करू लागली. भाजपचा आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेचा मुकुट एकट्या पवारांनी फक्त आणि फक्त राजकीय कसबाच्या जोरावर अलगद काढून घेतला आहे. पवारांनी या निवडणुकीत काय केले..? त्यांचे पंधरा मिनिटे पावसात भिजणे आणि चार मिनिटांचे पावसात भिजत केलेले भाषण अनेकांना घरी बसवण्यास कारणीभूत ठरले. या निवडणुकीत पवारांनी अनेकांना अंगी असलेल्या आत्मविश्वासाची आठवण करून दिली. ‘जे गेले त्यांचा विचार करू नका,’ असा संदेश देत आहे त्यांना समवेत घेऊन महाराष्ट्र पालथा घातला आणि तरुणाईला आत्मभान दिले. जे कोणी राष्ट्रवादी संपली म्हणत होती त्यांचे थोबाड फोडले. काँग्रेसला पुन्हा मुख्य प्रवाहात आणले. भाजपचा अहंकार संपवला तर शिवसेनेला ताकदीची जाणीव करून दिली.
भले महाराष्ट्रात कोणाचेही सरकार सत्तेवर येईल. कोणीही मुख्यमंत्री होईल. मात्र शरद पवारांनी गेल्या पंधरा दिवसांत जे काही राजकारणात डाव टाकले आणि अनेक नेत्यांना त्यांच्या असण्याची जाणीव करून दिली. भाजपच्या नेत्यांचा अहंकार कसा गळून पडला, याची चर्चा मात्र येथून पुढच्या काही विधानसभा निवडणुकीत सातत्याने होणार आहे.
मोहन मस्कर – पाटील यांच्या फेसबुक वरून साभार