मुंबई । आतापर्यंत हाती आलेल्या कलनुसार भाजप-शिवसेना युती पुन्हा सत्तेवर येईल, असे चित्र आहे. मात्र राज्यातील जनतेने भाजपाला एकहाती बहुमत दिले नसल्याचेही स्पष्ट होत आहे. अबकी बार 220 पार अशा थाटाच्या घोषणा जरी भाजपच्या काही नेत्यांकडून देण्यात येत असल्या तरी मतमोजणीच्या दिवशी तो केवळ शब्दांचा बुडबुडाच असल्याचे दिसून आले आहे. मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमधील कल हाती आले असून, त्यामध्ये भाजपच्या जागा गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी होत असल्याचे दिसते आहे. भाजप आणि शिवसेना युती सत्तेत परतण्याची चिन्हे असली तरी त्यांनी जी हवा तयार केली होती तशी वास्तविकता नसल्याचे दिसत आहे.
1. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात असलेला रोष आहे हे जाणून त्याचा निवडणुकीच्या प्रचारात वापर करून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी ठरला. पक्षाने आपल्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळाले.
2. सोशल मीडियाचाही राष्ट्रवादी काँग्रेसने चांगल्या पद्धतीने वापर केला. शरद पवार यांच्या जाहीर सभांचे फेसबुक लाईव्ह, भाजपने दिलेली आश्वासने कशी खोटी ठऱली हे दाखवून देणे, गेल्या पाच वर्षांत कोणती कामे झाली नाहीत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवून देण्यात विरोधक यशस्वी ठरले. त्याचाही परिणाम निवडणुकीवर झाला.
3. कलम ३७० रद्द करण्याचा मुद्दा भाजपने प्रचारात आक्रमकपणे वापरला. पण त्याला लागलीच विरोधकांकडून उत्तर देण्यात आले. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आणि कलम ३७० रद्द करण्याचा काय संबंध, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. त्यामुळे काही प्रमाणात मतदारही या मुद्द्यावर विचार करू लागले. त्याचाही परिणाम मतदानावेळी झाल्याचे दिसते.
4. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निवडणुकीत कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. वयोमानाचा विचार न करता राज्याच्या अनेक भागांत शरद पवार यांनी जाहीर सभा घेऊन भाजप-शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम पर्याय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत झाल्याचे दिसते आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा गेल्यावेळी हातातून गेलेल्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या दिशेने खेचण्यास सुरुवात केली आहे.
5. काँग्रेसने या निवडणुकीत अपेक्षितपणे प्रचार केला नाही. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात एकही प्रचारसभा घेतली नाही. तरीही काँग्रेसचे स्थानिक नेते आणि उमेदवार यांनी आपापल्या ताकदीवर जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे काँग्रेसच्या जागा गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा फार कमी झाल्याचे दिसत नाही. त्यातही काँग्रेसची पाळमुळे आजही ग्रामीण भागात घट्ट आहेत. त्यामुळे अनेक मतदारांनी ईव्हीएमवर पंजासमोरील बटण दाबल्याचे दिसते आहे.
शरद पवार, अजित पवारांसह विरोधी पक्षातील सर्वच महत्त्वाच्या नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपानं केला होता. यात काही अंशी यश आल्याचं प्रचारात दिसून आले होते. मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात भाजपाची खेळी सपशेल अपयशी ठरली आहे. बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या अजित पवारांसमोर भाजपानं धनगर समाजातील मते विचारात घेऊन गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे पडळकर काय चमत्कार करतात याकडं सर्वांच लक्ष होतं.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अजित पवार यांनी राज्यभर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या होत्या. राज्यातील प्रचाराच्या समारोपाची शेवटची सभा बारामतीत घेतली होती. तर दुसरीकडे भाजपाचं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही विशेष लक्ष दिलं होतं. लोकसभा निवडणुकीतही भाजपाकडून शरद पवार यांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता. त्या निवडणुकीतही सुप्रिया सुळे यांनी दणदणीत विजय संपादित केला होता.
दरम्यान, जातीय पातळीवर विधानसभा निवडणुकीचा विचार करूया. राज्यात 32% लोकसंख्या असलेला मराठा समाज आघाडी व युतीत विभागला असेल. भाजपत इनकमिंग झालेले बहुतेक मराठा जातसमूहाचे नेते असतील. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाया आणखी कमकुवत होईल. वंचित आघाडी विधानसभेला किमान 100 जागा केवळ धनगर समाजाला देणार आहे. 60 मतदारसंघात प्रभावी असलेला धनगर समाज प्रकाश आंबेडकरांच्या मागे जाऊ शकतो. त्याचा फटका जसा काँग्रेस-राष्ट्रवादीला बसेल तसाच तो युतीलाही बसेल. बसप, रिपाइं, शेकाप, भाकप, माकप हे पक्ष निष्प्रभ होतील. त्यांचे मतदार वंचितकडे वळतील. लोकसभेला 18 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने लाखाच्या वर मते घेतली होती. म्हणजे ही आघाडी विधानसभेला किमान 100 जागांवर जिंकवण्याची किंवा पाडण्याची किमया करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष या निवडणुकीत रिंगणात असणार आहे. मुंबई, ठाणे क्षेत्रातल्या 60 जागांवर मनसे प्रभाव टाकू शकते. त्याचा लाभ महाआघाडीला होईल. राज यांच्या मनसेचे विधानसभेला थाटात कमबॅक होईल