पार्थ आराध्ये
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सर्वपक्षीय नेते नेहमीच हजर राहतात. बुधवारी 25 डिसेंबर रोजी अशीच स्थिती होती. सकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मुंबईतून मांजरी (पुणे) येथे पोहोचण्यास जरा उशीर झाल्याने तोवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी सारेच संवाद साधत होते.
इतक्यात माजी उपमुख्यमंत्री व भाजपाशी निगडीत दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी पवार यांची भेट घेतली. बराच वेळ त्यांची चर्चा सुरू होती. दरम्यान माध्यमांनी देखील ही घटना थेट प्रक्षेपित केली. यानंतर व्हिएसआयचा कार्यक्रम झाला आणि जाताना विजयससिंह मोहिते पाटील यांनी पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना मी अद्याप ही राष्ट्रवादीमध्येच आहे, असे विधान करून जी गुगली टाकली की ज्यामुळे भाजपाचे नेते क्लीन बोल्ड झाले आहेत. नक्की मोहिते पाटील यांच्या मनात आहे तरी काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
राज्यात भाजपाचे सरकार येईल या आशाने अनेकांनी काँग्रेसस व राष्ट्रवादीचा त्याग करून हातात कमळ घेतले होते. मात्र आता दोन्ही काँग्रेस पक्ष व शिवसेना सत्तेवर आली आहे. महाविकास आघाडीचे राज्य सुरू असून याचे सूत्रधार हे अर्थात शरद पवार हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून साखरपट्ट्यातील नेते पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या. राज्यात सत्ता स्थापन होवून महिना ही झालेला नाही तोवर अन्य पक्षात गेलेल्यांना परत घेण्याच्या मनःस्थितीत पवार ही नाहीत अशी चर्चा होती.
मात्र आज व्हिएसआयच्या व्यासपीठावरील वातावरण वेगळेच होते. एका बाजूला शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या चर्चा रंगल्या होत्या तर दुसर्या बाजूला भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या गप्पा सुरू होत्या. एरव्ही पुणे जिल्ह्याच्या राजकारणात हे नेते एकमेकांविरोधात असल्याचे दिसून आले आहे.
विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी विजयदादांनी अधिकृतपणे गळ्यात कमळाचे उपरणे अद्याप तरी घातलेले दिसले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अकलूजमध्ये झाली. यास दादा उपस्थित राहिले पण त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला नव्हता.
मोहिते पाटील यांनी लोकसभा व विधानसभेला भाजपाला सहकार्य केले आहे. लोकसभा निवडणुकीत पवार यांनी मोहिते पाटील विरोधक संजय शिंदे यांना उमेदवारी दिली होती. यानंतर जिद्दीने मोहिते पाटील यांनी भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला व माळशिरस तालुक्यातून लाखाचे मताधिक्क्य दिले. विधानसभेला ही मोहिते पाटील यांनी या भागात भाजपासाठी काम केले खरे पण त्यांनी उमेदवारी ना लोकसभेला घेतली ना विधानसभेला.
रणजितसिंह मोहिते पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंध सलोख्याचे आहेत. मोहिते पाटील हे भाजपाशी निगडीत झाल्यानंतर शेजारच्या इंदापूर तालुक्यातील त्यांचे मित्र काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांनी देखील भाजपाला जवळ केले होते. आता राज्यात भाजपाची सत्ता नाही.
दोन्ही काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्या आहेत. अशा वेळी शरद पवार यांचे बेरजेचे राजकारण पुन्हा सुरू झाले की काय ? असा प्रश्न आजच्या कार्यक्रमाकडे पाहून अनेकांना पडला होता. हर्षवर्धन पाटील हे पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आहे. त्यांचा इंदापूर मतदारसंघ हा बारामती लोकसभेला जोडलेला आहे. आता आगामी काळात पुन्हा राज्यात महाविकास आघाडीची ताकद वाढवायची असेल तर बडे नेते सोबत लागणार आहेत हे जाणूनच कदाचित पुढील पावले उचलली जात असावीत अशी चर्चा आहे.
विजयसिंह मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याबरोबरच आजुबाजूच्या भागावर प्रभाव टाकणारे नेतृत्व आहे. त्यांना मानणारा मोठा मतदार या जिल्ह्यात आहे. हे शरद पवार ही ओळखून आहेत. म्हणूनच त्यांनी मोहिते पाटील यांना पाहताच थेट आपल्याजवळ बोलाविले व त्यांच्या बराच वेळ चर्चा केल्या. मोहिते पाटील व पवार यांच्या नेहमीच स्नेह राहिला आहे. पवार यांना माढ्यातून विजयी करण्यासाठी विजयदादांनी 2009 ला मेहनत घेतली होती.
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे मोहिते पाटील यांचे खच्चीकरण झाले होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ही राष्ट्रवादीचे सर्वाधिक सदस्य निवडून आणणार्या मोहिते पाटील गटाला बाजूला टाकण्याचा प्रयत्न झाला होता. या खच्चीकरणाला कंटाळून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली व भाजपाचा हात हातात घेतला होता.
विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मी राष्ट्रवादीचे आहे .. या वाक्याचा जो तो आपआपल्या परिने आता अर्थ काढत असून यावर आता काही दिवस चर्चा रंगणार आहेत. जोवर विजयसिंह मोहिते पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार नाही तोवर हाच विषय सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गाजत राहणार आहे. यातच आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक ही अवघ्या पाच दिवसांवर आली आहे.