मुंबई – महाराष्ट्राच्या जडणघडणीत पवारांचे योगदान आहेच व ते नाकारता येणार नाही. हे योगदान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत येऊन मान्य केले. पवार हे आपल्याला गुरुस्थानी असल्याचेही पंतप्रधान मोदी
यांनी हातचे न राखता अनेकदा सांगितले. त्यामुळे पवारांचे इतक्या वर्षांचे राजकारण, समाजकारणास मोदी यांनी मान्यता दिली आहे असं सांगत शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना
टोला लगावला आहे.
सोलापूरच्या महाजनादेश सभेत बोलताना अमित शहा यांनी पवारांवर टीका करत 50 वर्षात त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न विचारला होता. शहांच्या या भाषणाचा राष्ट्रवादी काँग्रेस कडून ही समाचार घेतला जात आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी ही याला उत्तर दिले आहे. यात शिवसेनेने ही उडी घेतली असून त्यावर शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे.
तसेच रोहित पवारांच्या रूपाने बारामतीत एका नव्या शरद पवारांचा उदय होत आहे असे कौतुक सामना च्या माध्यमातून शिवसेनेने केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील पक्षांतरा च्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी टीका केली होती. त्यावर सामना च्या अग्रलेखात म्हटले आहे की,चौथ्या पवारांनी तीर मारताना आता सांगितले की, घरात आमदारकीपासून खासदारकी आलेली नेते मंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. जाडंभरडं पीठ दुसर्या पक्षात गेलं असे चिरंजीव रोहित म्हणतात. हे पीठ राष्ट्रवादीचे खरंच होते काय? ते काही असो. सर्व पडझडीत प्रथमच एका पवारांचा तीर सुटला आहे. अर्थात या तीराने कोणी घायाळ झाले नाही, पण तीर सुटला हे महत्त्वाचे.
एका ‘चौथ्या’ पवाराने भाजपच्या आरोपांना उत्तर दिले असून पवारांचे नातू रोहित पवार यांनी विचारलेले प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. ‘पंत चढले राव आले’ अशी एक व्यवहारी म्हण आहे. त्या धर्तीवर ‘पार्थ पडले रोहित चढले’ असेच म्हणायला लागेल. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे कासवगतीने पुढे जात आहेत व शरद पवारांना सोबत करीत आहेत. बारामतीत नव्या पवारांचा हा उदय दिसत आहे.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.