उमेश पाटील सोलापूर ग्रामीणचे कार्यकारी अध्यक्ष
सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी जेष्ठ नेते बळीराम काका साठे यांची तर झेडपीचे सदस्य व प्रवक्ते उमेश पाटील यांची ग्रामीणचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल,नेते अजित दादा पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते उमेश पाटील यांना मुंबईत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या जिल्हाध्यक्षपदावर जेष्ठ नेते बळीराम काका साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उमेश पाटील यांच्यासाठी नव्याने पद निर्माण करण्यात आले आहे.
या निवडीबद्धल राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते काका साठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश जाधव,बालाजी सुरगुर,निशांत सावळे,विलास लोकरे आदी उपस्थित होते.
निष्ठावान आणि काम करणाऱ्या माणसांची गरज
नूतन जिल्हाध्यक्ष काका साठे म्हणाले,पूर्वीच्या अध्यक्षाने राजीनामा दिल्याने अध्यक्ष निवडणे गरजेचे होते. सध्या परिस्थिती बदलली आहे. पूर्वीसारखी नाही. सगळे लोक राष्ट्रवादी सोडून गेले आहेत. ज्यांना पदे दिली,मोठे केले,पुन्हा पुन्हा पदे दिली ते सर्वजण सोडून गेले.
आता पक्षाला अडचण निर्माण झाली आहे. खऱ्या अर्थाने निष्ठावान आणि काम करणाऱ्या माणसांची गरज आहे. पक्षाला पुन्हा उभारी घ्यायची असेल तर निष्ठावान माणसाला पदे देणे महत्वाचे आहे. त्यामुळे आपली निवड करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पद मिळाल्याने कसरत तर आहेच. असेही काम करावेच लागत होते.
पद नसतानासुद्धा आतापर्यंत काम काम केले आहेच. आता पदामुळे आणखी काम करावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत उभारणारा उमेदवार कसा निवडून येईल हे पाहणार आहोत. पक्षाशी प्रामाणिक असणाऱ्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. नेते पक्ष सोडून गेल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे.
सामान्य मतदार व कार्यकर्ता मात्र गेलेला नाही. ते पक्षासोबत आहेत. सर्वच ठिकाणी असे चित्र आहे. शरदचंद्र पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात सामान्य कार्यकर्ते आणि तरुण सोबत असल्याचे सिद्ध झाले आहे.
नव्या चेहऱ्याला संधी,तरुणांना जास्तीत जास्त सहभाग
काकासाहेबांचे वय पाहता त्यांना जिल्हाभर फिरता येणार नाही हे त्यांनी स्वतः सांगितले होते. जेष्ठ असल्याने आणि जिल्ह्याचा जेष्ठाचा समतोल राहण्याकरिता व महत्वाचा जिल्हा म्ह्णून काकांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे एक सेकंड पोस्ट तयार करून व तरुणाला संधी म्हणून आपणास ग्रामीण कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
नव्या चेहऱ्याला संधी,तरुणांना जास्तीत जास्त सहभाग आणि ज्यांनी पक्ष सोडला आहे , त्याठिकाणच्या कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष सोडून गेलेल्यांना धडा शिकविने असा आगामी विधानसभेचा अजेंडा असल्याचे नूतन कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले.
=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.