राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आज राज्यात कोरोनाचे आणखी ६७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर पोहचला आहे. तर आज ६ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यात कोरोनाचे ६७ नवे रुग्ण आढळले आहेत. यामधील ४३ रुग्ण हे मुंबईतील आहेत आणि १० रुग्ण मुंबईच्या आसपासच्या परिसरातील आहेत. तर पुण्यामध्ये ९ रुग्ण आणि अहमदनगरमध्ये ३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर पोहचला आहे. तर महत्वाचे म्हणजे, राज्यातील ५० कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात आज कोरोनामुळे ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई-विरार, बदलापूर, जळगाव, पुणे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा आणि मुंबईमधील २ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या राज्यामध्ये ३८ हजार ३९८ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर ३ हजार ०७२ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.